Malad Murder : मी मराठी तो भैय्या, मनातला राग, पेशन्स संपले अन्… दिग्गज नेत्याची पोस्ट चर्चेत

मालाड रेल्वे स्थानकात एका तरुण शिक्षकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्रूर कृत्यामागील सामाजिक कारणे आणि आरोपीच्या हिंसक मानसिकतेवर कपिल पाटील यांनी मांडले.

Malad Murder : मी मराठी तो भैय्या, मनातला राग, पेशन्स संपले अन्... दिग्गज नेत्याची पोस्ट चर्चेत
malad (1)
| Updated on: Jan 27, 2026 | 9:01 AM

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात एका ३२ वर्षीय शिक्षकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. क्षुल्लक वादातून लोकलमध्येच घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी माजी शिक्षक आमदार आणि दिग्गज नेते कपिल पाटील यांनी यावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आलोकच्या गर्भवती पत्नीचं आता काय होईल?’ असा काळजाला भिडणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी आरोपी ओमकार शिंदे याच्या हिंसक मानसिकतेमागच्या सामाजिक कारणांबद्दलही भाष्य केले आहे.

कपिल पाटील यांची पोस्ट

ट्रेनमध्ये धक्के कधी लागत नव्हते ? पण आता धक्काही सहन होत नाही. लोकांचे पेशन्स संपत चालले आहेत. किरकोळ कारणांवरून माणसं घायकुतीला येतात. 27 वर्षांच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने 32 वर्षांच्या प्रा. आलोक कुमार सिंह यांचा बळी घेतला. प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये तो गणित शिकवायचा. दोन वर्षांपूर्वी तो लेक्चरर म्हणून लागला होता. त्याचे प्राचार्य पराग आजगावकर सांगत होते, कोणत्याच भानगडीत न पडणारा, अत्यंत सालस पण तितकाच बुद्धिमान शिक्षक.

ट्रेनमधून अनेकदा दारात लटकून सगळेच प्रवास करतात. मीही केलाय लटकत. लटकणार्‍यांना लोक हाताने आधार द्यायचे.
पोलिसांनी अवघ्या 12 तासात मारणार्‍याला शोधून काढलं. पोलिसांचं कौतुकच. ओमकार शिंदे असं का वागला ? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती त्याची, तरीही जीवघेण्याचा गुन्हा त्याच्याकडून का घडला ? पोलीस शोधताहेत.

दोन – अडीच महिन्यांपूर्वीची घटना आहे, ‘भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है।’ एवढंच 19 वर्षांचा अर्णव खैरे बोलला. हिंदीत का बोलतो, म्हणून त्याला मराठी मुलांनीच ट्रेनमध्ये मारहाण केली. अपमान आणि भीतीच्या धक्क्याने कोवळ्या अर्णवने राहत्या घरी गळफास घेतला.

मालाडच्या घटनेला रंग देण्याची गरज नाही. पण माणसं घायकुतीला येतात. पेशन्स हरवतात. राग अनावर होतो. धारदार शस्त्राने थेट पोटात वार होतो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो. लोकही मध्ये पडत नाहीत. मारणार्‍याचे हात धरत नाहीत. माणसं प्रचंड भयाखाली जगताहेत. संशयाने पाहताहेत. एका बाजूला लोकलचा ताण, प्रचंड धावपळ, सुधारणांची शक्यता नाही. चिकटून एकमेकांचा घाम एकमेकात रिचवून प्रवास करणार्‍यांची मनं मात्र आता एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत.

कशामुळे हे घडतंय? अशांततेचे सोपे फंडे शोधतात आमचे नेते. त्यांच्या राजकारणासाठी. पण अप्रत्यक्षपणे ते लोकमनावर खोल परिणाम करत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरा- दारातले आणि प्रवासातले ताण – तणाव, संशय आणि द्वेष एकाबाजूला. तर दुसऱ्या बाजूला जगण्याची साधनं, उत्पन्न अत्यंत मर्यादित. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या माणसांचा स्फोट होतो.

गेले काही महीने भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाने कंठाळी गदारोळ सुरू आहे. मी मराठी तो भैय्या, मी हिंदू तो मुसलमान. आपली सहनशिलता आणि सहिष्णुता पार हरवून गेली आहे. मनात साचलेल्या रागाला आपल्याच सारख्या दुसर्‍या कष्टकरी माणसाला शत्रू बनवलं आहे. मारणारा ओमकार दिवसभर कष्ट करून किती कमवत असेल ? 15 – 16 हजार. पण आलोक सिंहचा पगार तरी किती होता ? तोही ज्युनिअर कॉलेजला कंत्राटी शिक्षक. जेमतेम 20 हजार. ओमकार 12वी पास होता, कोकणी मुलगा. पण ओमकारला राग व्यवस्थेचा येत नाही, आलोकचा येतो.

कुणीतरी त्याला तसं सांगितलेलं असतं. आपल्या घरातलं कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतं, त्याची काळजी आपणच व्हायला हवी. सहनशिलता आणि सहिष्णुता त्याला शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो. व्यवस्थेवर मात्र कधीच होत नाही. आपला मुलगा कोणावर तरी राग काढतो. त्याच्या हातून काही अघटीत घडतं. मग आपला मुलगाही वाचत नाही. नेत्यांच्या मुलांवर साधी केसही होत नाही. आलोक सिंहच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत होतो. त्याच्या वडिलांचा आणि गर्भार पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडत होता. त्याच्या गर्भार पत्नीचं काय होईल ?

महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओमकार सणकला. पुरुषी मानसिकता आणि दुसऱ्याचा द्वेष या दोघांचं कॉकटेल विषारी बनतं. आत्मघातकी बनतं. त्यातून टोकाची प्रतिक्रिया उमटते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओमकार सारख्या तरुणाकडून गुन्हा घडतो, हे अधिक गंभीर आहे. आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आणि ओमकार आपल्या घरातलाच… असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या लोकल प्रवासात झालेल्या एका किरकोळ वादाचा अंत इतक्या भीषण हत्येत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ही धक्कादायक घटना घडली. विलेपार्ले येथील प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक असलेले ३२ वर्षीय आलोक कुमार सिंह हे रात्रीच्या वेळी ट्रेनने घरी परतत होते. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना आरोपी ओमकार शिंदे (वय २७) याच्याशी त्यांचा किरकोळ धक्का लागल्यावरून वाद झाला.

प्राथमिक माहितीनुसार, लोकांच्या गर्दीत आणि महिलांसमोर आपला अपमान झाला, या रागातून ओमकार शिंदे याने रागाच्या भरात आलोक सिंह यांच्यावर धारदार शस्त्राने (सुरीने) वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की आलोक सिंह जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र रेल्वे पोलिसांनी (GRP) तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी ओमकार शिंदेला बेड्या ठोकल्या.