Girish Mahajan: मोर्चा वगैरे असल्यावर… भाजपच्या मोर्चाविरोधात त्रस्त महिलेचा संताप, महाजनांची पहिली प्रतिक्रिया काय?

Minister Girish Mahajan BJP Morcha: काल भाजपने जांबोरी मैदान परिसरात काँग्रेसविरोधात मोर्चा काढला. महिला आरक्षण बिल नामंजूर केल्यावरून मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. एका संतप्त महिलेने मोर्चेकऱ्यांना गेट आऊट म्हटले. तिच्या संतापाने मोर्चेकरीही भांबवले. आज या सर्व प्रकारावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Girish Mahajan: मोर्चा वगैरे असल्यावर... भाजपच्या मोर्चाविरोधात त्रस्त महिलेचा संताप, महाजनांची पहिली प्रतिक्रिया काय?
गिरीश महाजन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 22, 2026 | 12:35 PM

Minister Girish Mahajan BJP Morcha: महिला आरक्षण बिल नामंजूर झाल्यावर भाजपने काल राज्यात जनआक्रोश मोर्चा काढला. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात त्यामुळे एकच गर्दी झाली. वाहतूक खोळंबा झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यातील एका महिलेच्या संतापाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांनाही करावा लागला. या महिलेच्या रागाचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. या सर्व प्रकारावर आज गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वी असे मोर्चे निघाले नाहीत का? मोर्चेकरांमुळे 50 किलोमीटरपर्यंत हायवे जॅम झालेले पाहिलेले आहेत अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी पुन्हा वाद ओढावून घेतला.

मोर्चे वगैरे असल्यावर…

जांबोरी मैदान परिसरातील घटनेवर आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मोर्चे वगैरे असल्यावर अशा गोष्टी घडतात असे ते म्हणाले. यापुढे काळजी घेऊ, असे महाजन म्हणाले. काल हजारो महिला मुंबई सह देशभरात रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षण विरोधात मतदान केले व बिल पास होऊ दिले नाही. काल ट्राफिक कोंडी झाली होती. सर्वच पक्ष मोर्चे काढतात. कालच्या मोर्चात एक भगिनी आल्या, त्या वाट्टेल त्या बोलल्या. पोलिसांना तक्रार करायची होती. मी बाईट देताना त्या आल्या. पोलिसांनी त्यांना समजावले. त्या नको त्या भाषेत बोलल्या. महिला पोलीस आल्या. आम्ही संयमाची भाषा वापरली. त्यांनी बाटली देखील फेकून मारली. आम्ही पोलिसांना सांगितले, चिडू नका
त्यांना हवे ते बोलू द्या. महिलांच्या आरक्षणासाठीच तो मोर्चा होता. यापुढे काळजी घेऊ. मोर्चा व आंदोलनावेळी काळजी घेतली जाईल असे महाजन म्हणाले.

महिलेची कृती योग्य नाही

त्यांना त्यांचा राग वेगळ्या भाषेत मांडता आला असता. आम्ही रितसर परवानगी घेऊन मोर्चा काढला होता. सायंकाळची वेळ होती. रात्री तर मोर्चा निघू शकत नाही. मार्ग ठरलेला होता. नियोजन केलेले होते. त्यांचा राग फार अनावर झाला होता. महिला आरक्षणासाठीच हा मोर्चा होता. त्या मोर्चाविरोधात तक्रार करू शकल्या असत्या. जी भाषा वापरली ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी बाटली फेकून मारली. सौम्य भाषेत ही राग व्यक्त करता आला असता, असे महाजन म्हणाले.

Follow Us