
Anil Patil on Rohit Pawar: अजितदादांचा विमान अपघात की घातपात याबाबत आमदार रोहित पवार यांनी काहूर उठवलं आहे. त्यांनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषद घेतल्या. त्यात त्यांनी विविध दावे केले. त्यांनी प्रेझेंटेंशन सादर केले. त्यांनी पुरावे सादर केले. त्याआधारे त्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी त्यांनी DGCA सह काही मंत्री आणि नेत्यांवर घणाघाती टीका केली. तर याप्रकरणी दादांच्या राष्ट्रवादीतील नेते का बोलत नाही असा सवालही त्यांनी केला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्या आमदारांनी दबाव आणावा अशी मागणी काल त्यांनी केली. त्यानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी रोहित पवारांवर हल्ला चढवला आहे. ते दोषींना एकप्रकारे मदत करत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.
गोपनीयता ठेवायला हवी
या सर्व घडामोडींवर आमदार अनिल पाटील यांनी आज भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार आणि बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपघाताविषयी चौकशीची मागणी केलेली आहे. एखादा अपघात किंवा मृत्यू झाला असेल, नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल, याची पोलीस स्टेशनला नोंद केली जाते. विमानाचा अपघात म्हणाल्यानंतर त्याच्यात विमानात असलेले दोष,टेक्निकल माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु आहेडीजीसीएकडून अनियमीतता शोधण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली आहे, सीआयड़ी तपास सुरू आहे. या सगळ्या गोष्टींची गोपनियता ठेवावी लागते. यात कुणी दोषी असेल, कनक्लुजनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गोपनियता ठेवली पाहिजे. असे अनिल पाटील म्हणाले.
प्रेझेंटेंशन दाखवून दोषीला मदत?
आजपर्यंत ही गोपनियता ठेवली गेलेली आहे. एकदा अहवाल आला की विमानाचा मालक दोषी आहे की या यंत्रणेत अजून कोणी दोषी आहे का, घातपात आहे का, सीआयडीचा तपास सुरू आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि एफआयआर आपल्याला दाखल करता येईल. पण आम्हाला कधी कधी शंका वाटते की हा एक प्रकारे गोपनियता न पाळता जो कोणी या प्रकारात दोषी आढळणार आहे. त्याला एकप्रकारची मदत ही वेगवेगळे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे प्रेझेंटेशन दाखवून ती समोरच्यांना एकप्रकारची मदत होत आहे, असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. तर ही मदत त्या दोषीला न होऊ देता समजा जर त्या तपास यंत्रणांपर्यंत ही माहिती रोहित पवार यांनी दिली तर दोषींवर कारवाई होऊ शकते असे वक्तव्य अनिल पाटील यांनी केले.
आमची निष्ठा खुपत आहे
तर काल रोहित पवार यांनी त्या चार नेत्यांनी पक्षाचा ताबा घेतल्याचे सूतोवाच केले. त्यांनी सुनेत्रा पवार यांना न बोलू दिल्याचा आरोप केला. त्यावर आज अनिल पाटील यांनी टीका केली. अजितदादा कुणाच्याच दबावाखाली येत नव्हते. ते आयुष्यात कुणाच्या दबावाखाली आले नाहीत. कालपासून हे वेगळं बोलायला लागले आहेत, असा आरोप त्यांनी रोहित पवारांवर केला. सुनेत्रा पवार दबावात राहतील अशी टीका करणाऱ्यांना मला प्रश्न करायचा आहे की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी कुणाचा दबाव होता का, पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय़ घेतला तो कोणाचा दबाव होता का, हा दबाव नसून निष्ठेचा प्रकार आहे. आमच्या निष्ठेला पाहून हे लोकं वैफल्ल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना निष्ठा खुपत असल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला.