‘सौदीत भोंगे बंद होतात तर भारतात का नाहीत?’ राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, शिवतीर्थावरील भाषणाआधी इशारा

"तुम्ही गीतकार जावेद अख्तर यांचे पाकिस्तानमधील स्टेटमेंट ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू?", असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

सौदीत भोंगे बंद होतात तर भारतात का नाहीत? राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, शिवतीर्थावरील भाषणाआधी इशारा
| Edited By: Chetan Patil | Updated on: Mar 21, 2023 | 9:03 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्य आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या पक्षांचं लक्ष असणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात त्यांनी आपण आपली सविस्तर आणि रोखठोक भूमिका येत्या गुढीपाडव्याच्या सभेला मांडणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज एका ठिकाणी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आज सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे यांनी याआधीदेखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिशिंदींवर असणाऱ्या भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडलेली. त्यानंतर अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. राज ठाकरे यांनी तत्कालीन सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलेला. मशिदींवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला. त्यांच्या या भूमिकेवरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“जे हिंदुत्व-हिंदुत्व बोलतात. त्यांनी मला एकदा त्यांचे हिंदुत्व सांगावे. सौदीमध्ये भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे मोदी भोंगे बंद करू का शकत नाहीत? उद्या सभा आहेत. त्यात मी बोलेनच त्यामध्ये अजून कदाचित काहीतरी जास्तीत येईल”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर उद्या सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं आजच स्पष्ट केलंय.”तुम्ही गीतकार जावेद अख्तर यांचे पाकिस्तानमधील स्टेटमेंट ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू? या देशात इतकं टॅलेंट भरलेले आहे. तर ती पाकिस्तानी नरडी आपल्याला हवेत कशाला?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, “1995 नंतर भारतात चॅनल इंटरनेट असं सगळं येत गेलं आणि त्यामुळे राजकारण चळवळी अशा अनेक गोष्टींमधून सुशिक्षित वर्ग यातून बाहेर पडला आणि त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा हरवून गेला. 1995 च्या आधीचा सर्व काळ काढा. कोणतीही राजकीय चळवळ घ्या. त्यात मध्यमवर्गीय आणि सामान्य असाच लोकवर्ग होता. आणि तोच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा होता”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Follow Us