Lalbaugcha Raja : कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला? असा काय मोठा सल्ला देतात,जो..मनसेचा ‘लालबागचा राजा’ मंडळाला रोखठोक सवाल
Lalbaugcha Raja : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी लालबागचाा राजा मंडळावर सडकून टीका केली. सध्या या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरुप आलं आहे. बड्या मंडळांना प्रायोजकत्व देण्यावरुन कॉर्पोरेट कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याचं चित्र आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मुंबईत सध्या सर्वत्र या सणाची लगबग सुरु आहे. अनेक मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती मंडपात विराजमान होत आहेत. गणेशोत्सवाचा सण ही मुंबईची ओळख आहे. लाखो लोक या उत्सवात सहभागी होत असतात. दरवर्षी बड्या कंपन्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या उत्पादनाच्या जाहीराती करतात. या उत्सवात मोठ्या मंडळांना बड्या कंपन्याकडून प्रायोजकत्व मिळतं.पण सध्या या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरुप आलं आहे. बड्या मंडळांना प्रायोजकत्व देण्यावरुन कॉर्पोरेट कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याचं चित्र आहे. लालबागमध्ये दोन ते चार प्रसिद्ध गणेश मंडळं आहेत. यंदा लालबागच्या राजा मंडळाकडे अंबानींच्या रिलायन्सची स्पॉन्सरशिप आहे, तर समोरच्या बाजूला आलेल्या चिंचपोकळी चिंतामणी गणेश मंडळाला अदानी समूहाने प्रायोजकत्व दिलं आहे.
त्यावरुनच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी लालबागचाा राजा मंडळावर सडकून टीका केली. “‘लालबागचा राजा’ मंडळाने गेल्यावर्षी गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात दिला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायला पैसे लागतात, पण किती पैसे लागतात? आज लालबागचा राजा मंडळाकडे कोट्यवधी रुपये जमा होतात, लोकं स्वत: तुम्हाला देणग्या देतात, मग किती पैसे लागतात तुम्हाला? कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला तिकडे? अनंत अंबानी असा काय मोठा सल्ला देतात, जो इतकी वर्षे तुम्हाला मिळाला नाही” असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
गणेशोत्सव मंडळाची कंपनी करायची आहे का?
“गणेशोत्सवात फक्त गरबा बघायचा आहे का? गेल्यावर्षी लालबागच्या राजा मंडळाने गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देऊन याची सुरुवात केली” असं संदीप देशपांडे म्हणाले. “अनंत अंबानी यांना कुठल्या कारणासाठी सल्लागार म्हणून नेमले आहे? गणेशोत्सव मंडळाची कंपनी करायची आहे का? आता त्यांचे बघून अदानी आले. उद्या जेएसडब्ल्यू येईल, गोदरेज येईल, मग गणेशोत्सव मंडळं तुम्हाला कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवायचे आहे का?” असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
