पांढऱ्या पट्ट्यांऐवजी… मनसेचा जैन मुनींना नवीन प्रस्ताव, नितेश राणेंनाही डिवचले; वेदपाठक- देशपांडेंच्या भेटीत काय घडलं?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन मुनींना पांढऱ्या पट्ट्यांऐवजी रस्त्यावर हिरवी झाडे लावण्याचा पर्यावरणस्नेही प्रस्ताव दिला आहे. यामुळे पर्यावरण रक्षण होऊन मुनींना उन्हापासून दिलासा मिळेल असे ते म्हणाले. त्यांनी हिरव्या रंगावरून मंत्री नितेश राणेंनाही डिवचले. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण चुकीचे असून, कोणत्याही धर्माचा अतिरेक नको, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.

पांढऱ्या पट्ट्यांऐवजी... मनसेचा जैन मुनींना नवीन प्रस्ताव, नितेश राणेंनाही डिवचले; वेदपाठक- देशपांडेंच्या भेटीत काय घडलं?
Prasad Vedpathak
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 16, 2026 | 2:20 PM

पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा एकदा जैन मुनींना डिवचलं आहे. उलट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर आज जैन समाजाला नवीन प्रस्ताव दिला आहे. पांढऱ्या पट्ट्यांऐवजी तुम्ही हिरवी झाडे लावा असा प्रस्तावच संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसेच हा प्रस्ताव देताना त्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनाही डिवचले आहे. हिरव्या रंगावरून त्यांनी नितेश राणे यांना चिमटा काढला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, युट्युबर आणि कन्टेन्ट क्रिएटर प्रसाद वेदपाठक यांनी आज मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. यावेळी संदीप देशपांडे यांनी जैन समाजाला नवीन प्रस्ताव दिला आहे. जैन समाजाने पांढऱ्या पट्ट्या ऐवजी हिरवी झाड लावावी. त्याच्या आजूबाजूने जैन मुनींनी चालत यावं. जैन मुनींच्या पायाला चटके बसू नये याची आम्हालाही काळजी आहे. पण पांढऱ्या पट्ट्याऐवजी झाडं लावली तर वातावरण थंड राहील. पर्यावरणाचं रक्षण होईल, असं सांगतानाच हिरव्या झाडांची तक्रार नितेश राणे यांना असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही, असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला.

सीबीआयचं का? रॉ किंवा एनआयए का नाही?

ललित गांधी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरही संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं. सीबीआयचं का? रॉ का नाही? रॉ किंवा एनआयएकडून चौकशी करावी, असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला. सार्वजनिक मालमत्तेवर अशा प्रकारे पांढऱ्या पट्ट्या मारणं चुकीचं आहे. रस्त्याचं विद्रूपीकरण करणं चुकीचं आहे. पांढऱ्या पट्ट्या का मारतात? जैन समाज ज्या सोसायटीत राहतो त्यांनी झाडे लावावीत. कोणी विरोध करणार नाही. झाडंही हिरवीच असतात, असं त्यांनी सांगितलं.

अतिरेक नकोच…

आम्हला गुन्ह्याच टेन्शन नाही. ज्यांनी आधी पांढरीपट्टी मारली त्याच्यावर आधी गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. सुक्ष्म जीव मारला जाऊ नये म्हणून पांढऱ्या पट्ट्यांची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. मग असं असेल तर जैन लोकांनी कोव्हिडची लस घेतली की नाही? त्याने बॅक्टेरिया मारला गेला नाही का? बॅक्टेरियाही जीवच आहे ना? घरात डास आले तर त्यांना मारतात की चावू देतात? असे सवाल करतानाच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. तुमच्या धर्माच तुम्ही पालन करा. पण आमच्यावर लादू नका, असा इशारा त्यांनी दिला.

मला ट्रोल करत…

यावेळी प्रसाद वेदपाठक यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात आमचा विषय प्रॉपर्टीसाठी होता. इतक्या वर्षापासून आम्ही इथे राहतो. इतके दिवस खेळीमेळीचं वातावरण होतं. मी पोलिसांना पत्रव्यवहार केला आहे. तोंड दाबून मुक्याचा मार सुरू आहे. आम्हाला सर्व प्रथम मनसेने पाठिंबा दिला. हळूहळू हे प्रकरण वाढत आहे. मनसेने खूप मदत केली. इतरांनी हवी तशी मदत केली नाही. माझ्यासाठी हा वाद कधीच संपला होता. पण आता माझ्या मागे काही माणसे मागे मागे असतात. मला ट्रोल करत आहेत, असं प्रसाद वेदपाठक म्हणाले.

Follow Us