मुंबई-ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी सुचवले उपाय
एमएमआरडीए आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबई-ठाणे प्रवास वेगवान करण्याचे उपाय सुचवले
ठाणे : दररोज मुंबई-ठाणे प्रवास करताना वाहतूक कोंडीने वैतागलेल्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या मे महिन्यापर्यंत कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा पहिला टप्पा पार पडेल, अशी ग्वाही गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी (Mulund-Thane bridge Widen) शिंदेंनी काही उपायही सुचवले.
एमएमआरडीए आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी याविषयी माहिती दिली. चौपदरी रस्ता आठपदरी करण्याचं काम कूर्मगतीने सुरु आहे. अडीचशे कोटी रुपये खर्चून सुरु केलेल्या या प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईमुळे वाहनचालक दररोज त्रागा व्यक्त करतात. मात्र पुढील पाच महिन्यात मुंबई-ठाणेकरांचा प्रवास वायुवेगाने होण्याची चिन्हं आहेत.
मुंबईकरांनो जर रस्त्यावर कचरा टाकत असाल, तर ‘हे’ नक्की वाचा
ठाणे ते मुलुंड दरम्यान पर्यायी रस्ते तयार करणे आणि लेन स्पेस वाढवण्यासाठी सद्य रस्त्यांवरील दुभाजक हटवण्यासह अनेक उपाय एकनाथ शिंदे यांनी सुचवले. जादा लेन तयार करण्यासाठी शहराच्या सीमेवर असलेल्या रिक्त झालेल्या जकात नाका आगारांच्या चाचपणी करण्याची शिफारसही त्यांनी केली.
पुलाच्या दोन्ही बाजूला दोन लेन टाकण्यासह पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झालं आहे. “पायाभरणीचं काम सुरु असून या कामाला आणखी दोन महिने लागतील. पालघरमधील कार्यशाळेत पुलाचा गर्डर तयार केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात गर्डर साईटवर आणण्यात येईल आणि त्यानंतर दोन महिन्यांत उभारला जाईल’ अशी माहिती एकनाथ शिंदे (Mulund-Thane bridge Widen) यांनी दिली.