Mumbai Metro : मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु

मुंबई मेट्रोच्या दहिसर ते गुंदवली मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, गेल्या १५ मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकात थांबली आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु
mumbai metro
| Updated on: Feb 19, 2026 | 11:52 AM

मुंबईकरांसाठी मुंबई लोकलसोबत जीवनवाहिनी ठरत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. मुंबईकरांच्या प्रवासाला गती देणाऱ्या मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली) मार्गिकेला आज तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये अचानक बिघाड झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच उभी आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या दरम्यान मुंबई मेट्रोच्या दहिसर ते गुंदवली या मार्गावर बिघाड झाला. दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या १५ मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच रखडली आहे. या बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) तातडीने हालचाली सुरू केल्या. गुंदवली स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अचानक सेवा ठप्प झाल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या बिघाडामुळे संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकप्रिय मार्गिकेला तांत्रिक ग्रहण

दरम्यान मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकांना मुंबईकरांनी अल्पावधीतच पसंती मिळाली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ४४.२६ लाख प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. दररोज सरासरी १.४७ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. विशेषतः गुंदवली, मागाठाणे आणि अंधेरी पश्चिम या स्थानकांवर प्रवाशांचा मोठा भार असतो. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील (WEH) वाहतूक कोंडी २५ टक्क्यांनी आणि लोकल ट्रेनचा भार १५ टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, अशा वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवासी पुन्हा रस्ते वाहतुकीकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अलीकडेच मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आजच्या या तांत्रिक समस्येमुळे मेट्रोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.