मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? वाचा लेटेस्ट अपडेट
Mumbai Schools Latest News : उद्याही मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, कार्यालये चालू असणार की बंद असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत लेटेस्ट अपडेट जाणून घेऊयात.

मुंबईसह आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगरातील शांळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता उद्याही मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, कार्यालये चालू असणार की बंद असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
8 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद?
मुंबईला उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, मात्र सध्या तरी 8 जुलै (बुधवार) रोजी शाळा, महाविद्यालये किंवा कार्यालयांना सुट्टी वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), महाराष्ट्र सरकार किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून नवीन आदेश जारी होत नाही तोपर्यंत मुंबईतील शैक्षणिक संस्था आणि कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
बीएमसी प्रशासन शहरातील हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. रात्रीच्या पावसाची तीव्रता आणि IMD च्या ताज्या अंदाजानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवास करण्यापूर्वी संबंधित शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयाच्या अधिकृत सूचनांची वाट पहावी लागणार आहे.
❌मुंबईतील शाळा मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी बंद असतील. तसेच, खासगी क्षेत्रातील कार्यालयांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशा आशयाचा संदेश समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे याबाबत स्पष्ट करण्यात येत आहे की, हा संदेश पूर्णत: खोटा… pic.twitter.com/dgBFyB2j70
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 7, 2026
मुंबईत पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट कमी करून यलो अलर्ट जारी केल्याने शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यलो अलर्ट म्हणजे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यासोबत अधूनमधून जोरदार वारे वाहू शकतात. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत परिस्थितीत सुधारणा झाली असली, तरी सखल भागांमध्ये पाणी साचणे आणि स्थानिक पातळीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसांत झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईतील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. शहरी भागात सुमारे 300 मिमी, पूर्व उपनगरात सुमारे 380 मिमी आणि पश्चिम उपनगरात सुमारे 345 मिमी पावसाची नोंद झाली. ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडेही उन्मळून पडली. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावल्या. तसेच दृश्यमानता कमी झाल्यामुळे विमानसेवाही विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.