कुणाला पत्नी समोर मारले, कुणाला शाब्दिक वादातून भोसकले, तर कुणाला… मुंबईत एकाच दिवशी तीन जणांची हत्या; मोठी खळबळ
मुंबईत रविवारी अतिशय भयानक अशा तीन घटना घडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची हत्या करण्यात आली. एकाची तर किरकोळ वादामुळे भर रस्त्यात हत्या करण्यात आली.

मुंबईत रविवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पूर्व वैमनस्य आणि छोट्या-छोट्या वादातून भयानक घटना घडल्या आहेत. या तीन हत्यांनी संपूर्ण शहर हादरले आहे. दादर, माटुंगा आणि खेरवाडी परिसरात या घटना घडल्या आहेत. एका घटनेत तरुणाला पत्नीसमोर बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले तर दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाला गाडी पार्किंगच्या वादातून मारहाण करून ठार करण्यात आले. आणखी एका धक्कादायक प्रकरणात युवकाला जुन्या शाब्दिक वादातून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. तीनही प्रकरणांत पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे.
दादर : पत्नीसमोर ७ जणांनी केली बेदम मारहाण
दादरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची पत्नीसमोरच निर्घृण हत्या करण्यात आली. अंकुश आंबेकर (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा गौरव सनस याच्याशी जुना वाद होता. रविवारी अंकुश आपल्या पत्नीसोबत मित्र भूपेंद्र सोलंकी यांना भेटायला सयाजी वाडी येथे जात असताना आरोपींनी त्याची वाट अडवली. गौरव सनस, अनिल पटेल, राजेश पटेल, सिद्धेश पटेल, साहिल राणे, अविनाश खवरे आणि अजय यादव या सात जणांनी अंकुशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंकुशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
माटुंगा : पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ नागरिकाची हत्या
माटुंग्यात गाडी पार्किंगच्या छोट्याशा वादाने विकोपाला जाऊन एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या झाली. नरेश वाघेला (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. दादर टाटा येथील ब्रिजखाली वाहन उभी करू नये म्हणून ते आरोपींना समज द्यायला गेले असता आरोपी साहिल घाडगे आणि शाहबाज मो. रफिक शेख यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. वाघेला यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सविता देखील होत्या. अचानक दोन्ही आरोपींनी वाघेला यांना मारहाण सुरू केली आणि पळ काढला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सविता वाघेला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली आहे.
खेरवाडी : जुन्या वादातून धारदार शस्त्राने हत्या
खेरवाडीमध्ये जुन्या शाब्दिक वादातून एका युवकाला धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्यात आले. कल्पतरू स्पार्कल्स येथे ही घटना घडली. अभिनव चौधरी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. अभिनवच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांनी तीनही प्रकरणांत तातडीने कारवाई केली असून, शहरात कुठेही छोट्या वादातून हिंसाचार होऊ नये यासाठी गस्त वाढवली आहे. मात्र, एकाच दिवशी तीन हत्यांनी मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आणखी काही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.