Mumbai : वीज यंत्रणा पाण्यात गेल्याचा अलर्ट सेकंदाला मिळणार
पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 125 ठिकाणी कंपनीने पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसवले आहेत
मुंबई : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) उपनगरात (Suburbs) अनेक ठिकाणी पाणी भरते. त्यामुळे वीज पुरवठा (Power supply)बंद ठेवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या भागात किती पाणी भरले आहे, वीज वितरण यंत्रणेला (Power distribution system) पाणी लागले की नाही याबाबतची प्रत्येक सेकंदाची माहिती आता अदानी इलेक्ट्रिसिटीला (Adani Electricity) मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी पाणी भरणारी 125 ठिकाणे निश्चित करून तेथे सेन्सर बसवले आहे. या माध्यमातून अदानीला कोणत्या भागातील वीज पुरवठा कधी बंद करावा, कधी सुरू करावा याचे योग्य नियोजन करता येणार आहे.
पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर
अदानी इलेक्ट्रिसिटीचे उपनगरात 28 लाख वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कंपनीकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीने मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. येथे सॅटेलाइट, वायरेलस, हॉटलाइन, वॉकीटॉकी आणि रिमोट उपकरणांच्या माध्यमातून कंपनीच्या अंतर्गत विभागात समन्वय साधून अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे.
अदानीचे उपनगरात 125 ठिकाणी पाणीपातळी दर्शविणारे सेन्सर
पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 125 ठिकाणी कंपनीने पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसवले आहेत. तसेच खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी क्वीक रिस्पॉन्स टीम तैनात केल्या आहेत. त्याचबरोबर डिझेल जनरेटर सेट उपलब्ध करून दिले आहेत. आपत्कालीन संपर्कसाठी टोल फ्री क्रमांक – 19122.