‘शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा, तुम्हाला पाषाणही म्हणता येणार नाही’, आव्हाड संतापले

"ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो. पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही", अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.

शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा, तुम्हाला पाषाणही म्हणता येणार नाही, आव्हाड संतापले
Chetan Patil | Updated on: Feb 04, 2024 | 5:44 PM

विजय गायकवाड, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भाषणात टोला लगावला. “शेवटची निवडणूक सांगून मते मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका”, असं आवाहन अजित पवारांनी केलं. “कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका”, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. “ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो. पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही. तुम्ही भावनाशुन्य झाला आहेत. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कोणत्याच मिटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.

“प्रत्येकाला मरायचे आहे. अजित पवार तुमचीही शेवटची निवडणूक येणार आहे. पण बापाच्या मरणाची वाट बघणारी अवलाद नाही बघितली. मीही माझ्या बापाच्या मरण यातना बघितल्यात. मलाही वाटायचे माझा बाप वाचावा. पण तुम्ही तर चक्क बापाची तिरडीच उचलालाय निघालात. आणि हा महाराष्ट्राचा नेता हा, लाजच वाटते,अशा माणसाबरोबर काम केलं हे तर किळसवाणं वाटतं”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“जेव्हा शरद पवार बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असंच झालं पाहिजे म्हणायचे. तुमची नजर असायची भलतीकडे (अजित पवार यांचा आवाज काढत). या महाराष्ट्राला कळेल की काय माणूस आहे हा की आपल्या काकांच्या मृत्यूची वाट बघतोय. हे राजकारण आहे का? अजित पवार काय भावनिक अवाहन करतात की कधी असेल शेवटची निवडणूक? ते शरद पवार आहेत, ते अजरामर राहतील, त्यांचे योगदान आहे”, असं जितेंद्र आव्हा़ड यांनी ठणकावून सांगितलं.

‘तुमची उंची तर ओळखा’

“मी बारामतीत काम केलं. बारामतीत मी केलं (अजित आवाज) आरे बारामती दिली कोणी तुम्हाला, आरे ते बारामती भलत्यालाच देऊ शकले असते. कोणी आणले बारामतीत डायमयनिक्स, कुणी आणली बारामतीत MIDC, कुणी आणला csr फंड, तुम्हाला माहित होता का csr फंड? आंतराष्ट्रीय कंपन्या येतात, miltan येतो हे तुम्हाला भेटायला येतात का? जागतिक दर्जाचे नेते बारामतीला येतात ते तुमच्यामुळे येतात का? तुमची उंची तर ओळखा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली’

“ज्या मनमोहन सिंहनी सांगितले की लिबरल इकॉनॉमिक हा सब्जेक्ट ज्यांच्याकडून शिकलो ते शरद पवार, त्यांचे डाओसचे 1991 चे भाषण ऐका. सत्ता गेली तरी चालेल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच, असे म्हणणारे शरद पवार. महिलांना आरक्षण देणारे शरद पवार, त्यांच्या घोषणा आणि पॉलिसी ऐका. लातूरला भूकंप झाला, दीड महिना तिथेच राहिले आणि घर उभारली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही”, असं आव्हाड म्हणाले.

“दुष्मणाचाही बाप मरू नये असे म्हणणारे आम्ही आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली. बारामतीत लहान पोरांनाही माहीत आहे ही बारामती कोणी नांगरली तिची मशागत केली, आणि कोणी कुणाच्या हातात दिली. तिथं भावनिक आवाहन करतील तर नाही त्या ठिकाणी बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, मला तर आधी पासूनच वाटायची. शरद पावरांबाबत तुम्ही नेहमी काहीतरी मुद्दा काढूव त्यांच्या उंचीची हवा काढून टाकायचे, ह्या सुपाऱ्या अजित पवार तुम्ही खूप वेळा वाजविल्या आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us