पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर, वाहतुकीत मोठा बदल; वाचा कोणता रस्ता बंद कोणता चालू?
Mumbai Traffic Change : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. खालील मार्गांवरील बाहतूक बंद राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 17 तारखेला दुपारी 2.15 वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर, दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. दुपारी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6.30 वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, व्हीव्हीआयपी नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत. उद्या कोणते मार्ग बंद राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण मुंबईतील हे मार्ग राहतील बंद
- छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक बंद असणार आहे, फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल.
- नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतूकीसाठी बंद असणार आहे.
- रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे.
- पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात येईल. अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे उद्या बंद राहणार आहे.
दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बदल लागू राहणार
गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित भारत–फ्रान्स ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ कार्यक्रमाच्या (14 ते 22 फेब्रुवारी 2026; मुख्य कार्यक्रम 17 फेब्रुवारी) पार्श्वभूमीवर लगतच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या या बदलांची नोंद घेण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
