Pratap Sarnaik : हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
Pratap Sarnaik on Marathi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी शिकणे गरजेचे नसल्याचे वक्तव्य केले होते. तर आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक पाऊल पुढे टाकत, हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राहायचे म्हणून मराठी शिकणे गरजेचे नसल्याचा जावाई शोध लावला होता. त्या पाठोपाठ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तर आता हिंदीला डोक्यावरच घेतले आहे. “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे,” असं वक्तव्य सरनाईकांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मराठी भाषिक नाराज झाले आहेत. तर त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेने त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे. हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळं हिंदी आता बोलीभाषा झाली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुदध मराठीत बोलतो. जेंव्हा मिरा भाईंदरकडे जातो तेंव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो आहोत, अशी पुश्ती सरनाईक यांनी यावेळी जोडली.
संजय राऊतांची जहरी टीका
हिंदी भाषा महाराष्ट्राची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असे वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा समाचार राऊतांनी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज घेतला. मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी, त्याला मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगताप यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. आणि हेच लोक आता म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत. त्यांच्या नेत्यांना विचारा की त्यांची भूमिका आहे का? मराठी मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? त्यांचा जो विचार आहे तो हा भाजपचा विचार आहे हा अमित शहांचा विचार आहे. मी वारंवार सांगतो त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शाह आहेत. त्यामुळे शाह हे जे बोलतात, तेच हे लोक बोलतात असा टोला राऊतांनी लगावला.
ही तर मतांसाठी लाचारी
प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर मनसेतून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली. मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई घाण ठेवणार असणार ते आम्हाला मान्य नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी लढत राहू असे किल्लेदार म्हणाले. माझ्या राजाची, राज्याची, मुंबईची आणि माझ्या बापाची वाडवडीलांची भाषा मराठी आहे. मुंबई देखील मराठी माणसांची आहे हे प्रताप सरनाईक यांना माहिती आहे की नाही अगोदर त्यांचे मंत्री हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायला हवा असा बडबडले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
