Raj Thackeray: हे समजायला अक्कल लागते… विन्स्टन चर्चिलचा दाखला देत राज ठाकरेंनी झोडपले

Raj Thackeray On Winston Churchill: ग्रेट ब्रिटेनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचं उदाहरण देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला मोठा संदेश दिला आहे. सरकारवर जनतेचा वचक ठेवणे गरजेचा आहे असा आशय त्यांचा होता. काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray: हे समजायला अक्कल लागते... विन्स्टन चर्चिलचा दाखला देत राज ठाकरेंनी झोडपले
राज ठाकरे, विन्स्टन चर्चिल
| Updated on: Jul 09, 2026 | 2:39 PM

Raj Thackeray On Winston Churchill: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी करतानाच जनतेला कानपिचक्याही दिल्या. जनतेला रागच येत नाही. आला तर तो सोशल मीडियावर चेपून ते मोकळे होतात. सत्ताधाऱ्यांना धाकच उरला नाही. लोकशाही जिवंत ठेवायचं असेल ना तर पक्ष चुकत असतील तर बोललं पाहिजे, असे राज ठाकर यांनी बजावले. त्यांनी ग्रेट ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचं एक चपखल उदाहरण भारतीय जनतेला दिले. त्यातून त्यांनी मोठा संदेश दिला.

मतदारात राग दिसत नाही

झाडची झाडं काढली जात आहे. जंगलं नष्ट केली जात आहे. लोकांना राग येत नाही. लोक राग व्यक्त करत नाही. मोबाईलवर व्यक्त करतात आणि झालं. तो राग मतदानात दिसत नाही. नेमकं काय हवंय. कुणाची सत्ता आहे, कुणाची नाही काही घेणं देणं नाही. भाजपचं सरकार आहे. चांगलं काम करा. वाईट काम केलं तर बोलणारच आम्ही, असा थेट इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर…

भाजपचा आमदार लोक मेल्यावर हसतो. भावनाशून्य आहे. तुम्हाला किंमत नाही. आमच्याकडे शहरं कशी वाढतात, कसली चिंता नाही. आमची सत्ता टिकते का, खासदार फोडता येतो का यावर चिंता सुरू आहे. तीन वर्ष निवडणुका नाही. लोकं म्हणतील आता मतदान नाही. चिडून काय फायदा नाही. अरे चांगलं वाईटावर मतदान झालं पाहिजे. राज ठाकरे चुकत असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवायचं असेल ना तर इतर पक्ष चुकत असतील तर बोललं पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

विन्स्टन चर्चिल यांच्या उदाहरणातून झणझणीत अंजन

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी राज ठाकरे यांनी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे एक चपखल उदाहरण दिले. “दुसरं महायुद्ध संपल्यावर सर्वांची वाहवा झाली. इंग्लंडची वाहवा झाली. विन्स्टन चर्चिलची वाहवा झाली. त्यांची एक मुद्रा होती हाताची व्ही फॉर व्हिक्ट्रीची. विस्टन चर्चिलचं कौतुक झालं. आठ महिन्याने निवडणुका झाल्या. चर्चिलचा पक्ष हारला. ज्याच्या नावावर युद्ध जिंकल्याची गोष्ट होती. तो हरला. पत्रकाराने लोकांना प्रश्न विचारलं असं काय झालं. तर लोक म्हणाले, युद्ध काळात तो योग्य होता. शांततेच्या काळात नाही. हे समजायला अक्कल लागते. याला लोकशाही म्हणतात. चांगल्या गोष्टीत काय हवं, काय नको हे समजणारा समाज लागतो. शिक्षण घेऊन उपयोग नाही. शिक्षित असून उपयोग नाही.माणूस सूज्ञ लागतो. बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या. पण त्या बोलून गेल्या. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बोलायला सूज्ञ लागतो माणूस. ज्या देशात समाज सुज्ञ असतो तेव्हाच प्रगती होते. तेही कामावर जातात. जगातील प्रत्येक माणूस कामावर जातो. पण तो विचार करतो. आपण नाही विचार केला तर कसं होईल.”

मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊत?- राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. यात मी लक्ष घालतो. ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर चौकशी लावतो, असं बोलायला हवं होतं. ते राहिलं बाजूला. राजकारण करेल त्याला बघून घेईल. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस बघून घ्यायची कोणती भाषा आली. पण हे सुरू होतं. एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन. माझ्या नावावर पाच मर्डर आहे. आपल्या राज्यात होऊ शकतं. कारण ते सत्तेत आहेत. हे बोलायची हिंमत होते. कारण कुणाचा कुणावर अंकूश नाही. जे काही महाराष्ट्रात सुरू आहे. तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

बाकीच्या ठिकाणचं सोडून द्या. रेल्वेत लक्ष द्या. फक्त रेल्वे येते आणि जाते एवढंच नाही. कोण घुसतंय ते पाहा. स्टॉलची टेंडर मराठी मुलांना मिळाली पाहिजे. प्रत्येक स्टेशनला मिळाली पाहिजे. यावर बारीक लक्ष हवं. हे लक्ष नसेल तर काय चाटायचे वर्धापन दिन. काय करायचा वर्धापन दिन. एकच सांगतो. जागे राहा. सतर्क राहा. आपला मराठी ठसा रेल्वेतून पुसला जाणार नाही यासाठी काम करा, असे राज ठाकरे म्हणाले.

Follow Us