
BJP Protest Against Satyacha Morcha : आज महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा सुरू होईल. त्यानंतर महापालिकेकडे हा मोर्चा वळेल. पुढे या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. दरम्यान या मोर्चाविरोधात भाजपने पण दंड थोपाटले आहे. मोर्चाविरोधात भाजप आज मुंबईत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला मुक आंदोलन असे नाव देण्यात आले आहे. काय आहे अपडेट?
विरोधकांच्या मोर्चा विरोधात आज भाजपचे आंदोलन
विरोधकांच्या मोर्चा विरोधात आज भाजपही आंदोलन करणार आहे. गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर भाजप आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा व काही आमदार हे मुक आंदोलन करणार आहे.
महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांविरोधात हे आंदोलन असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. आज दुपारी १ वाजता भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजप मुक आंदोलन करणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? असा सवाल करत रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंगल प्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात येणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी साधला मोर्चावर निशाणा
आपल्या लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. परंतु काही मोर्चे व आंदोलन ही जनहितार्थ असतात व काही मोर्चे हे स्वहितासाठी व स्वार्थासाठी असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं व मोर्चे यातून केवळ जनतेचे नुकसान होतं व जनतेला असुविधा होते. आजचा हा मोर्चा हा निश्चितपणे हेतू पुरस्कर मोर्चा आहे त्याच्या फायद्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. यातून जनतेचा कुठलाही फायदा होणार नाही. संविधानिक संस्थांवर आरोप करणं, शंका उपस्थित करणं यातून काहीही साध्य होणार नाही. लोकसभा निवडणुकी वेळी निकालानंतर असे मोर्चे का काढले नाही? हे प्रश्न देखील जनता यांना विचारेल. त्यामुळे सभागृहात विषय मांडणे, संविधानिक व्यासपीठावर विषय मांडणे व त्यातून चर्चा करून काहीतरी उपाययोजना किंवा आपले विचार समोर आणणे यात तथ्य आहे. मात्र केवळ एक खोटा नरेटीव्ह निर्माण करण्यासाठी जनतेला असुविधेत टाकण्यात येते, तेव्हा त्याचे चोख उत्तर जनता निवडणुकीत देत असते, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.