Sharad Pawar: नागरिकांमध्ये अस्वस्थता… काळजी वाढली… काटकसरीच्या घोषणेनंतर शरद पवार यांचा PM मोदींना तो सल्ला… केले मोठे आव्हान
Sharad Pawar tweet to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करण्याचा, खाद्यतेल कमी खाण्याचा तर सोने आणि चांदी खरेदी न करण्याचा सल्ला दिला. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले.

Sharad Pawar tweet to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करण्याचा, खाद्यतेल कमी खाण्याचा तर सोने आणि चांदी खरेदी न करण्याचा सल्ला दिला. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी एक्स हँडलवरून ट्वीट केले आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांनी मोठे आव्हान केले आहे. त्यांनी जनतेच्या मनात काय सुरू आहे, याविषयीची कल्पना पीएम नरेंद्र मोदी यांना या ट्वीटच्या माध्यमातून करून दिली आहे.
नागरिकांमध्ये मोठी काळजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राजकीय विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या भूमिकेवर सडेतोड मत मांडलं आहे. “मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.” असे ट्वीट पवार यांनी केले आहे.
सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घ्या
“या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.” असे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक,…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 12, 2026
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे, असे सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत.
पाच राज्यांच्या निवडणुका आटोपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या घोषणेने देशवासियांची काळजी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. तर काही वस्तूंच्या किंमती महागण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी पंतप्रधानांच्या भूमिकेवर आता तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसते.
