सिद्धिविनायक मंदिरात मोठा घोटाळा, एका तक्रारीने खळबळ; रडारवर कोण?
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून, कायदा व न्याय विभागाने कार्यकारी आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांना सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली आहे.

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सध्या एका मोठ्या प्रशासकीय वादामुळे चर्चेत आले आहे. मंदिराच्या काही विश्वस्तांनी कार्यकारी अधिकारी वीणा पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या दोन विश्वस्तांनी आणि इतर तीन स्वतंत्र तक्रारदारांनी कायदा व न्याय विभागाकडे धाव घेतली होती. प्रशासकीय कामात पारदर्शकता नसणे, अधिकारांचा गैरवापर करणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. खुद्द विश्वस्तांनीच ही तक्रार केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
शासनाचा आदेश काय आहे ?
कायदा व न्याय विभागाने या आरोपांची प्राथमिक दखल घेत सखोल चौकशीचे संकेत दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सात दिवसांत आपला खुलासा सादर करा, असे आदेश देण्यात आले आहे. तसेच जर या खुलाशामध्ये समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर पुढील कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना कायदा व न्याय विभागाने तपासासाठी मंदिरातील दस्तऐवज तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तपासाच्या कक्षेत असणारी महत्त्वाची कागदपत्रे
- निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे.
- निविदा उपसमितीच्या बैठकांचे इतिवृत्त (Minutes of Meeting).
- विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयांच्या नोंदी.
- प्रशासकीय स्तरावर जारी केलेले महत्त्वाचे आदेश.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अन्न आणि महाप्रसादाशी संबंधित कंत्राटे आणि त्यांचे करार.
वारंवार होणाऱ्या वादांमुळे प्रतिमेला तडा
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंदिरात चोरी केल्याच्या आरोपाखाली आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाचा विनियोग पारदर्शकपणे होत आहे का, असा सवाल आता सामान्य भाविकांमधून विचारला जात आहे. या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
