विखे पाटलांनी करून दाखवलं… मृतांच्या वारसांना तातडीने मदत, बीडपासून लातूरपर्यंत… सरकारचा मोठा निर्णय

Financial Assistance to Maratha Protests Family: अखेर मराठा समाजाच्या न्याय मागण्यातील अजून एक मागणी सरकारने मार्गी लावली. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलनकांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला मोठे यश आले आहे.

विखे पाटलांनी करून दाखवलं... मृतांच्या वारसांना तातडीने मदत, बीडपासून लातूरपर्यंत... सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 3:16 PM

Manoj Jarange Radhakrushana Vikhe Patil Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील ३४ व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 30 मे रोजी रणरणत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. त्यानंतर शासन दरबारी अनेक तातडीचे निर्णय घेण्यात आले. त्यात हा एक निर्णय समोर आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शब्द खरा करून दाखवला.

३०९ आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांत एकूण ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी २७ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. यापैकी ३४ व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणे अद्याप बाकी होते. अखेर या ३४ व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांचे आश्वासन पाळले आहे.

विखे पाटील यांनी करून दाखवलं

अंतरवाली सराटी येथे 30 मे रोजी मराठा आरक्षणातील प्रलंबित मु्द्यांवर मनोज जरांगे पाटील हे रणरणत्या उन्हात उपोषणाला बसले. त्यापूर्वी आणि आंदोलनावेळी जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे) मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. जरांगे पाटील उर्वरीत मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही होते. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि प्रलंबित मागण्यांसह उर्वरित वारसांना तातडीने मदत देण्याची ग्वाही उपोषण स्थळी दिली होती.

मराठवाड्यातील या जिल्ह्यातील वारसदारांना मदत

राज्य सरकारने मागील दोन दिवसांत कार्यवाही केली. विविध जिल्ह्यांतील एकूण ३४ मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये, याप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे. त्यात मराठवाड्यातील बीड जिल्हयातील १५, धाराशिव ५, परभणी ४, हिंगोली ४, नांदेड ३, जालना १, छत्रपती संभाजीनगर १ आणि लातूर १ अशा वारसांचा समावेश आहे, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने करण्यात येत आहे. उपसमितीच्या बैठकीत सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यावर वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us