शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ नाशिकवरून मुंबईकडे

| Updated on: Jan 24, 2021 | 3:55 PM

(Thousands of farmers march from Nashik to Mumbai to join protest)

शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकवरून मुंबईकडे
Follow us on

नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून पायी निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत कोणत्याही क्षणी धडकण्याच्या मार्गावर आहे. सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या असून मुक्काम करत करत हे सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानात येत आहेत. (Thousands of farmers march from Nashik to Mumbai to join protest)

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकवरून सुरू झाला. काल संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लाँग मार्च सुरू झाला. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सर्व जण पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकऱ्यांचा हा जत्था कसारा घाटापर्यंत आला आहे. काल रात्री इगतपुरीतील घाटंदरी येथे या शेतकऱ्यांनी मुक्काम केला. त्यानंतर पुन्हा पहाटे नव्या उमेदीने सर्व शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे सर्व शेतकरी आझाद मैदानात पोहोचून जोरदार आंदोलन करणार आहेत.

कृषी कायदा रद्द करा

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे. त्याशिवाय राज्य सरकारकडे आमच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात महात्मा फुले कर्ज माफी योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानात धरणे धरणार आहोत, असं अजित नवले यांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर आमचं हे आंदोलन संपूर्ण देशभर पसरणार असून सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत, असंही ते म्हणाले. (Thousands of farmers march from Nashik to Mumbai to join protest)

संबंधित बातम्या:

बिहारी, मुस्लिम मतांवर एमआयएमचा डोळा; पालिका निवडणुकीच्या जुगाडासाठी बिहारचे पाच आमदार मुंबईत

मोठी बातमी: 27 जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक

राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा, जनगणनेसाठी ओबीसींचा राज्यभर एल्गार

(Thousands of farmers march from Nashik to Mumbai to join protest)