बालाजी तांबे यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 10, 2021 | 6:37 PM

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

बालाजी तांबे यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असं फडणवीस म्हणाले. (Tribute from Devendra Fadnavis after demise of Balaji Tambe)

बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आहे आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान आणि आधार देणार्‍या असायच्या. मी बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं सांगण्यात आलं आहे. ते 81 वर्षांचे होते. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्य विषयक घडामोडींवर अत्यंत जागरुकपणे त्यांनी अनेक दशकं काम केलं. केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

इतर बातम्या

प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

VIDEO: चंद्रकांतदादा चार दिवस दिल्लीत थांबले, ना मोदी, ना शहांची भेट; मनसे युतीचा निर्णय अधांतरी?

(Tribute from Devendra Fadnavis after demise of Balaji Tambe)