अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पाडण्याचा डाव सुरु आहे का? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis on Ajit Pawar : शिवसेनेसोबत भाजपची नैसर्गिक युती आहे. तर अजितदादा यांच्यासोबत राजकीय युती असल्याचे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुतीमधून अजितदादांना बाहेर पाडण्याचा डाव सुरू आहे का? या प्रश्नाचे त्यांनी असे उत्तर दिले.

अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पाडण्याचा डाव सुरु आहे का? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस, अजित पवार
| Updated on: Sep 06, 2024 | 1:52 PM

शिवसेनेसोबत भाजपची नैसर्गिक युती आहे. तर अजितदादा यांच्यासोबत राजकीय युती असल्याचे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. टीव्ही9 मराठी कान्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलनात, महायुतीमधून अजितदादांना बाहेर पाडण्याचा डाव सुरू आहे का? या प्रश्नाचे त्यांनी असे उत्तर दिले. त्यांना या मुद्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अजितदादांना बाहेर पाडण्याचा डाव?

अशा प्रकारच्या स्टेटमेंट चुकीच्या आहेत. एक प्रकारे अशा प्रतिक्रिया देऊन पक्षाला खड्ड्यात घालतो आणि महायुतीला कमजोर करतो. आता लवकरच तीन पक्षाचे तीन अधिकृत प्रवक्ते जाहीर करणार आहोत. ते बोलतील तेच अधिकृत असेल. बाकी काही नसेल. काही मतदारसंघात स्पर्धा असते. काही कार्यकर्त्यांना वाटतं आपण ५०० मतांनी हरलो ती जागा मिळायला पाहिजे. हे बरोबर आहे. पण त्यातून महायुतीला कमी करतोय असं वाटू नये, असे फडणवीस म्हणाले.

दादाची एक्झिट नाही. असं कोणतंही एक्झिट नाही. आम्ही सर्व एकत्र राहणार आहोत. छोटे मित्र पक्षही सोबत असतील. लोकसभेलाही महायुती होती तीच विधानसभेत राहील. प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. आपल्याला संधी मिळाली पाहिजे. पण दादाला बाहेर पडण्याचा डाव वगैरे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दादा गुलाबी झाले, पण भगवे झाले नाही

छोटीशी गोष्ट आहे. उदाहरण म्हणून नाही. अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. ४० वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांना असं कधी पाहिलं का. गेले ना, त्यांना आमचे काही गुण लागणार ना. काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आता स्पष्टच झालंय. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते. त्यांची अपेक्षा होती त्यांचा चेहरा घोषित व्हावा झाला नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही दिल्लीत जातो. ते तीन दिवस बसले. सोनिय गांधींनी बैठकीचा फोटोही जाहीर होऊ दिला नाही. तीन दिवसात काही झालं नाही. शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही हे जाहीर केलं. नाना पटोले यांनी त्यांची री ओढली. त्यामुळे हे पक्क झालं की उद्धव ठाकरेंच्या मनात जे होतं. त्यांना चेहरा समोर ठेवायचं ते झालं नाही. पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिजतंय. मला विचारू नका. त्यांच्या डोक्यात तीन चार चेहरे असतील. त्यात उद्धव ठाकरे नाही. त्यांच्या डोक्यात कोण आहे हे सांगणं कठीण आहे. पण कोण नाही हे मी सांगू शकतो, असा चिमटा त्यांनी ठाकरे यांना काढला.

आमची दादांसोबत राजकीय युती

आमची आणि शिवसेनेची युती नॅचरल आहे. वर्षानुवर्ष एका विचाराने आम्ही काम करत आहोत. त्यानंतर राजकीय परिस्थिती निर्माण झाली. अजितदादा सोबत आले. त्यांना सोबत घेतले. ती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय होती. अजून पाच दहा वर्ष गेले तर आमची त्यांच्याशी नॅचरल युती होईल. पण आजच नॅचरल युती आहे, असं म्हणाल तर अजितदादांशी नॅचरल युती नाही. हे खरं आहे. जे स्पष्ट आहे ते बोलतो. राजकीय युती आहे, म्हणजे ती तकलादू नाही. राजकीय यूती ही अनेक वर्ष चालते. आमचीही चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us