AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | ‘सर्वोच्च न्यायालय यांचं प्रत्येकवेळेला कानफाट फोडतंय, पण तरीही…’, उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

"मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी कुणाचाही अपमान करु इच्छूक नाही. न्यायाधीश, न्यायमूर्तींचा करुच शकत नाही. पण ज्या पद्धतीने हे सर्व चाललं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एक विनोद सांगितला.

Uddhav Thackeray | 'सर्वोच्च न्यायालय यांचं प्रत्येकवेळेला कानफाट फोडतंय, पण तरीही...', उद्धव ठाकरे यांची सडकून टीका
| Updated on: Oct 24, 2023 | 10:03 PM
Share

मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचा आज दसरा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी जवळपास एक तास भाषण केलं. यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. “सर्वोच्च न्यायालयात यांचं प्रत्येकवेळेला कानफाट फोडतंय लवादचं. पण प्रत्येकवेळेला निर्लज्ज सदासुखी, कानफाट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं वेळापत्रक सादर करु”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“ते तिकडे मेळावा घेत आहेत, बोला आमच्यावर टीका करा. मी तुम्हाला किंमत देत नाही. माझ्यासमोर महाराष्ट्रातला गोरगरीब आहे. मी जरांगे पाटील यांना खास धन्यवाद यासाठी देतोय की, जातीपातीच्या भींती उभ्या करुन आपापसात भांडण लावण्याचं काम जे भाजप करत आहे त्याला आपल्या सर्वांना मोडून काढायचं आहे. आपण सर्व एका मातीची लेकरं आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“फक्त आपण ज्यांच्याविरोधात लढतोय ते साधेसुधी नाहीत तर कपटी आहेत. विघ्नसंतोषी आहे. भाजप एवढा विघ्नसंतोषी आहे की, कुणाचंही लग्न असो, ते जाणार, पंगतीला बसणार. भरपूर जेवणार, आडवी हाक मारणार, मग श्रीखंड पुरी, बासुंदी खाणार. किती पुरणपोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाणार. फस्त करणार आणि निघताना नवरा-बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“ही पार्टी जिथे जाते तिथे सत्यनाश करते. त्यामुळे मी जरांगे पाटील यांना सांगतो की, यांच्यापासून सावध राहा. आजसुद्धा त्यांनी जे केलंय. हा भगवा मानाने फडकतोय. पाणीपतला जो अब्दाली आला होता त्याने हेच केलं होतं. दुहीचे बिजं पेरायचे. भांडणं लावायचे. चुली पेटवायचे सोडून घरे पेटवायचे. पुन्हा तुमचे रक्षणकर्ते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजतो. हे आता उघडउघड दिसतंय”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

“जवळपास एक वर्ष होऊन गेलं आहे. आपण अपात्रतेच्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तारखेवर तारीख. काय करायचं तेच कळत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात यांचं प्रत्येकवेळेला कानफाट फोडतंय लवादचं. पण प्रत्येकवेळेला निर्लज्ज सदासुखी, कानफाट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं वेळापत्रक सादर करु. ठीक आहे. तुम्ही तुमचं वेळापत्रक द्यायचं तेव्हा द्या’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी कुणाचाही अपमान करु इच्छूक नाही. न्यायाधीश, न्यायमूर्तींचा करुच शकत नाही. पण ज्या पद्धतीने हे सर्व चाललं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो. एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात. कुणाला तारीख दे, कुणाची सुनावणी घे, कुणाचा निर्णय दे, सोबत कोण असतो त्याला विचारता की, पुढची केस कोणती? मग तो सांगतो, साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढल्याची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“छेड काढल्याची घटनेवर कुणीही चिडणारच. न्यायाधीश म्हणतात बोलवा त्यांना. एक आजोबा काठी टेकत टेकत येतात. न्यायाधीशांचं डोकं आणखी फिरतं. ते म्हणाले, तुम्हाला लाज नाही वाटत. आजोबा झाले, काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता? शरम नाही वाटत? ते आजोबा शांतपणाने न्यायाधीशांकडे बघून सांगतात, न्यायाधीश महाराज जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुद्धा मी 20 वर्षांचा होतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काय कळलं? तारीख पे तारीख सुरु आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा. आज संपूर्ण देश अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? घटनेचं अस्तित्व राहणार आहे की नाही?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.