मुंबईहून बेलापूरला पोहोचा अवघ्या 35 मिनिटात; वॉटर टॅक्सीतून करा सुस्साट जलप्रवास!

| Updated on: Jan 03, 2022 | 7:23 PM

मुंबई ते बेलापूर हे अंतर आता फक्त 35 मिनिटात पार करता येणार आहे. कारण नव वर्षानिमित्त या महिन्यापासू मुंबई ते नवी मुंबईच्या दरम्यान जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सीमधून करता येणे शक्य होणार आहे.

मुंबईहून बेलापूरला पोहोचा अवघ्या 35 मिनिटात; वॉटर टॅक्सीतून करा सुस्साट जलप्रवास!
water taxi
Follow us on

अक्षय मंकनी, मुंबई: मुंबई ते बेलापूर हे अंतर आता फक्त 35 मिनिटात पार करता येणार आहे. कारण नव वर्षानिमित्त या महिन्यापासू मुंबई ते नवी मुंबईच्या दरम्यान जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक अत्याधुनिक वॉटर टॅक्सीमधून करता येणे शक्य होणार आहे. वॉटर टॅक्सी तब्बल 25 नोट्स इतक्या वेगाने धावते. त्यामुळे कमीत कमी वेळेत मुंबईपासून नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा इथे पोहोचता येईल. त्यासाठी ‘बुक माय बोट डॉट कॉम’ या वेबसाइटवर तिकीट उपलब्ध असणार आहे.

भाऊचा धक्का इथे असलेल्या डोमेस्टिक क्रुज टर्मिनलमधून आपल्याला या हायस्पीड वॉटर टॅक्सीचा प्रवास करता येईल. बेलापूर आणि नेरुळ येथे याच जलवाहतुकीसाठी जेट्टी देखील निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सध्या नेरूळ किंवा बेलापूर इथून सीएसएमटी पर्यंत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास करायचा झाला तर एक तास पाच मिनिटे इतका वेळ लागतो. तोच प्रवास रस्ते मार्गाने करायचा असल्यास रस्त्यावरचे खड्डे, अनेक ठिकाणी मिळणारे ट्रॅफिक, वाशी इथला टोल आणि असंख्य अडचणींचा सामना करून दीड ते दोन तास आपल्या लागतात. त्या मानाने मुंबई बेलापूर ही जलवाहतूक सर्वात वेगवान समजली जात आहे. इन्फिनिटी हार्बर सर्विस या कंपनीला जलवाहतुकीचे लायसन्स मिळाल्याने त्यांनी तीन मार्गांवर ही जलवाहतूक सुरू करण्याचे ठरवले आहे या सगळ्या संकल्पनेला मुंबईकरांकडून कसा प्रतिसाद मिळणार आहे ते पाहणे आता खरतर महत्त्वाचं ठरणार आहे.

किती पैसे मोजाल?

या वॉटर टॅक्सी सफरीसाठी बक्कळ रक्कम मोजावी लागणार आहे. एका फेरीसाठी अंदाजे 500 ते 750 रुपये मोजावे लागतील. एकाच दिवसात जाऊन यायचं असेल तर दोन फेऱ्यांसाठी किमान 800 ते 1200 रुपये तिकीट असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पासेसची सेवाही देण्यात आली आहे. मात्र, महिन्याभराच्या पाससाठी एक दोन नव्हे तर 12 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, या पासद्वारे वॉटर टॅक्सीतून कितीही वेळा आणि कोणत्याही मार्गावरून प्रवास करता येणार आहे.

 

संबंधित बातम्या:

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा, धनंजय मुंडेंचीही मोठी घोषणा

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता

ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर