अदानी-अंबानी यांच्यात नेमका फरक काय? राज ठाकरे थेट बोलले, मोदी मोठे झाल्यानंतरच..
उद्धव ठाकरेंसोबत दिलेल्या संयुक्त मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला. नवी मुंबई विमानतळाचं उदाहरण देताना त्यांनी मुंबई विमानतळाचा सगळा भाग विकायला काढायचा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती केली. या युतीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी नुकतीच एक संयुक्त मुलाखत दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या दोघांनी मिळून राज-उद्धव ठाकरे यांची ही संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. यावेळी गौतम अदानी यांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. नवी मुंबई विमानतळावरून राज ठाकरेंनी अदानी आणि भाजपच्या सरकारवर सडकून टीका केली. त्याचवेळी त्यांनी अदानी आणि अंबानी यांच्यातला मोठा फरक सांगितला.
काय म्हणाले राज ठाकरे?
“मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे, पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताचं मुंबईतलं विमानतळ अदानीकडे आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं ते मोठं आहे. म्हणजे हे उद्या हे सगळं डोमेस्टिक, इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सगळा भाग विकायला काढायचा हाच त्यांचा प्लॅन आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर “हे सगळं मोदी, शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का,” असा सवाल संजय राऊतांनी केला.
राऊतांच्या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे पुढे म्हणाले, “त्याच्यानंतरच झालं ना.. व्यवसाय करताना तर चोऱ्यामोऱ्या सगळेच करत असतील, पण अदानी आणि अंबानी यांच्यातील मोठा फरक बघायचा असेल तर तो हा आहे की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्याचवेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत.”
“समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचं सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशाप्रकारे रिअॅक्ट झाला असता,” असा प्रश्न राज ठाकरेंनी भाजपला केला.
