पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा; विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
मेळाव्यात टाळ्या वाढत असताना एखाद जादा वाक्य बोललं जातं. मात्र, जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेता हाच प्रमुख असतो. | Ajit Pawar
नागपूर: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असे वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. भाषणात बोलण्याच्या नादात अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. पण ज्या पक्षाकडे बहुमत असते त्यांचाच प्रमुख असतो, असे अजित पवार यांनी म्हटले. (Ajit Pawar on Vijay wadettiwar comment about OBC CM)
ते सोमवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांनी जालन्यातील ओबीसी महामोर्चावेळी केलेल्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आपण ज्या समाजातून पुढे येतो त्यांच्या मेळाव्यात अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया येतात. मेळाव्यात टाळ्या वाढत असताना एखाद जादा वाक्य बोललं जातं. मात्र, जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेता हाच प्रमुख असतो. तरीही विजय वडेट्टीवार यांच्या विचाराला आमच्या शुभेच्छा आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
ओबीसी महामोर्चावेळी काय झालं होतं?
ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी गेल्या महिन्यात जालन्यात ओबीसी महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावले होते.
संबंधित बातम्या:
आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट
ओबीसी जनगणनेबाबात एकमत, महाराष्ट्र विधानसभेत कोण काय म्हणाले?
(Ajit Pawar on Vijay wadettiwar comment about OBC CM)