Babanrao Taywade: मोठी बातमी! आमच्या मंचावर या, बबनराव तायवाडे यांचं मनोज जरांगें यांना थेट निमंत्रण, बदलणार मराठा-ओबीसी समीकरण?
Babanrao Taywade Invites Manoj Jarange: ओबीसी आणि मराठा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राचा ध्यास धरल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या होत्या. पण आता पुलाखालून बरेच पाणी गेल्याचे समोर आले आहे. आमच्या मंचावर या, असे बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगें यांना थेट निमंत्रण धाडले आहे.

महाराष्ट्रात अजून एका समीकरणाची नांदी समोर येत आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढ्यासाठी हाक दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस पुन्हा मराठा वादळ घोंगावण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या मंचावर येण्याचे आवताण धाडले आहे. यामुळे राज्यात ओबीसी-मराठा नवीन समीकरणाची ही नांदी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी शांतताप्रिय आणि शिस्तीने मोठे मोर्चे, आंदोलनं झालीत. उभा महाराष्ट्र त्याचा साक्षीदार आहे. त्यानंतर या आंदोलनाची धूरा वडीग्रोदीजवळील अंतरवाली सराटीचे मनोज जरांगे पाटील यांनी खांद्यावर घेतली. जालन्यात तीन वर्षांपूर्वी त्यांनी हुंकार दिला. त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निमित्ताने राज्यातील बड्या नेत्यानी मोठी धावपळ केली. अंतरवाली सराटीत नेत्यांची रीघ लागली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीची मोट बांधली. ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्रासाठी हुंकार भरला. त्यानंतर लाखोच्या संख्येने पुन्हा मोर्चे निघाले. वाशीच्या वेशेवर सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयऱ्याची अधिसूचना महत्त्वाची ठरली. जरांगे यांनी त्यानंतर चार उपोषण केली. आता अखेरचा निर्णायक लढा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मंचावर येण्याचे आवताण
मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बंगळूरू येथील राष्ट्रीय अधिवेशनात यावं, त्यांना आम्ही मंचावर जागा देऊ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना खुलं निमंत्रण धाडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गोवा अधिवेशनात जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. तर आता बंगळुरु येथे होणाऱ्या ओबीसींच्या महाअधिवेशनात येण्याचं मनोज जरांगे यांना आवाहन त्यांनी केले आहे.
ते माझे विरोधक नाहीत
मनोज जरांगे माझे विरोधक आहे असं मी समजत नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. 7 ॲागस्टला बंगळुरु येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात एकूण 16 ठराव मंजूर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विजय वडेट्टीवार यांचे कौतुक
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काढलेली मंडळ यात्रा चांगला उपक्रम असल्याचे कौतुकही तायवाडे यांनी केले. ओबीसींवर न्याय देण्यासाठी अशा हजार यात्रा काढाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघावर ज्यांने आरोप केले त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत. आम्हाला सरकराकडे निधी मागण्याची आवश्यकता नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, असे तायवाडे म्हणाले.