राहुल गांधी यांचा एकमेव अजेंडा काय? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं थेट उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधींचा एकमेव अजेंडा 'अराजकता' असून त्यांना देशाशी काहीच देणंघेणं नसल्याचं फडणवीस म्हणाले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश, मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका, आणि नागपूरच्या पूरस्थितीवरही त्यांनी माहिती दिली.

राहुल गांधी यांचा एकमेव अजेंडा काय? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं थेट उत्तर
Devendra Fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 3:12 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधी काहीही बोलू शकतात. ते काय बोलतात ते देशाला माहीत आहे. राहुल गांधींकडे एकच अजेंडा आहे. अराजकता हा एकच अजेंडा त्यांचा आहे. त्यांना देशाशी काहीच घेणं देणं नाही. फक्त अराजकता हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाचे होते, असा आरोप राहुल गांधी यांनी संसदेत केलाय. गांधी यांच्या या आरोपावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींचं भाषण मी ऐकलं नाही. त्यांच्या भाषणात काहीच राहत नाही. कोणत्याही पक्षाचा नेता बोलतो तेव्हा आरोप करतो, त्याने चुकीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पण राहुल गांधी देशाच्या तरुणांसाठी सकारात्मक काय बोलले? तुम्ही काय पर्याय दिला? देशातील तरुणांचं कल्याण होईल असं काय सांगितलं? राहुल गांधी केवळ दिवसभर खोटं बोलत आहेत. मोदींनी तरुणांचा विचार केला आहे. बिल पास झाल्यावर परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केसेस मागे घेण्याचे आदेश

यावेळी त्यांनी राज्यातील आंदोलनप्रकरणी विद्यार्थ्यांवर टाकण्यात आलेल्या केसेस मागे घेण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केलं. आंदोलनात ज्या केसेस झाल्या त्या केसेस परत घ्या, असे आदेश राज्यातील गृह आणि पोलीस विभागाला दिले आहेत. राज्यात सर्वाधिक जमावबंदीच्या केसेस आहेत. पण ज्या काही केसेस असतील त्या परत घेण्याचे आदेश दिले आहेत, असं सांगतनाच आंदोलनावेळी महाराष्ट्रात पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतली होती, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

त्यावर मार्ग काढता येईल

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. जात प्रमाणपत्र मागितल्यावर मिळतं. ज्यांनी ज्यांनी मागितलं त्याला मिळालं आहे. माझ्या माहितीनुसार पेंडन्सी कमी आहे. कोणी मागतंय आणि मिळत नाही असं नाहीये. आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आणि कार्यान्वित केले तेवढे कोणत्याच सरकारने घेतले नाही. कुणाचा रोष असेल आणि योग्य होत नाही असं वाटत असेल तर त्यावर मार्ग काढता येईल, असं त्यांनी सांगितलं.

संध्याकाळपर्यंत मोठा पाऊस

नागपूरच्या पूर स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. काही भागात पाणी आहे. नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज संध्याकाळी 5 वाजेनंतर मोठा पाऊस येईल. प्रशासनाशी चर्चा झाली. प्रशासनाची तयारी झाली आहे. 15 दिवसाचा महिनाभराचा पाऊस एका दिवसात येत आहे. त्यामुळे पाऊस वाहून नेण्याची सिस्टीम नाहीये. त्यामुळे पाणी तुंबत आहे. भविष्यात याचा विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.

शहरात काही ठिकाणी पाणी निचरा करण्याची कामं सुरू आहेत. काही कामे अर्धवट आहेत. त्यामुळे पाणी थांबलं. पण सरसकट नाहीये. पण 1 ते सव्वा तासात 100 ते 125 मिली मीटर पाऊस पडला तर सिस्टिम कोलमडते. इतका पाऊस एकत्र आला तर काही ठिकाणी पाणी भरतं. अचानक भरपूर पाऊस पडत आहे. पालघर वगैरे ठिकाणी तेच झालं, अशी माहितीही त्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us