Nagpur NMC | पायी चालण्याचा अधिकार माहीत आहे काय?; नागपूर शहरात केली जातेय जनजागृती
शहरात पायी चालता यावे, यासाठी प्रमुख रस्त्यावर फुटपाथ ठेवण्यात आला आहे. याचा पायी चालण्यासाठी योग्य वापर करावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. पायी चालणे हा आपला अधिकार असल्याचं ते म्हणाले.
नागपूर : नागपूर शहरातील फुटपाथ, रस्त्यांवरून नागरिकांना मोकळेपणाने चालता यावे, प्रत्येकाने पायी चालावे, प्रत्येकाला तसा अधिकार आहे. या जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या पायी चालण्याचा अधिकार या अभियानाचा मेडिकल चौक (Medical Chowk) येथून शुभारंभ (launch of the campaign) करण्यात आला. यावेळी महापौरांनी मेडिकल चौक ते अशोक स्तंभ चौकापर्यंत चालून जनजागृती केली. बारा सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक महिन्याच्या एकरा तारखेला आता हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारा सामाजिक संस्थांचा सहभाग
याप्रसंगी युवा दौड मंचचे अध्यक्ष तथा नॅशनल रोड सेफ्टी कौन्सिल, परिवहन मंत्रालय भारत सरकारचे अशासकीय सदस्य राजू वाघ, रोडमार्क समनेट इंडियाचे सदस्य सचिन पुराणिक, फेसकॉम विदर्भ अध्यक्ष बबनराव वानखेडे, विदर्भ जेष्ठ नागरिक महामंडळाचे सचिव अविनाश तेलंग, रोटरी क्लब, चेतना बहुद्देशीय संस्थेचे अविनाश इलमे, सोहम बहुद्देशीय संस्थेच्या श्रुती देशपांडे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदा नायडू, जिजाऊ संस्थेच्या शारदा मनोहर गावंडे, आनंद कजगिकर, अथर्व काठोते, गणेश तायडे, अखिल पवार आदींसह एकूण 12 सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मनपाचे वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे यावेळी उपस्थित होते.
चालण्यासाठी फुटपाथ, रस्ता
शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रत्येकाला पायी चालण्याचा अधिकार मिळावा याबाबत जनजागृती करीत या अभियानाचा शुभारंभ केला. महापौर तिवारी म्हणाले, 11 जानेवारी संपूर्ण भारतात पादचारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पायी चालण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. वर्षातून एक दिवस पायी चालण्यासाठी साजरा करण्यापेक्षा दर महिन्याला याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. या संकल्पनेतून पायी चालण्यासाठी चालण्यायोग्य फुटपाथ, रास्ता असावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.