लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट… अपात्र ठरल्या, सखोल चौकशी होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची सखोल चौकशी सुरू झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हजारो महिला अपात्र आढळल्या असून, त्यांच्यावर कारवाईचे संकेत आहेत. केवायसी समस्यांमुळे अनेकांना निधी मिळत नाहीये, तर नांदेडमध्ये महिलांनी थकलेल्या पैशांसाठी आंदोलन केले.

लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट... अपात्र ठरल्या, सखोल चौकशी होणार
ladki bahin
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 6:08 PM

लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्यांची आता काही खैर नाहीये. सरकारने सांगूनही या योजनेतून नाव न काढलेल्या आणि नंतर छाननीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी कधीपासून लाभ घेतला? चुकीची माहिती का दिली? याबाबतची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. नंदूबार जिल्ह्यात तर याची चौकशी सुरू झाली आहे. जिल्ह्यात असंख्य अपात्र लाडक्या बहिणी आढळल्याने ही चौकशी केली जात आहे. प्रशासानाने तसे कारवाईचे संकेतच दिले आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला नंदुरबार जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील 4 लाख 34 हजार 400 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 लाख 22 हजार 758 महिला पात्र ठरल्या असून, 11 हजार 722 महिला अपात्र ठरल्या आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांची आता सखोल पडताळणी केली जाणार आहे. लाभार्थी महिला खऱ्या आहेत का? याची तपासणी प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविका अधिकारी संजय पाटील यांनी दिली आहे.

केवायसी केली नाही म्हणून…

ई-केवायसीसाठी डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, तर तांत्रिक अडचणी असलेल्या महिलांना 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी अपात्र लाभार्थ्यांची चौकशी होणार असून, चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

केवायसी करूनही…

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला अद्याप वंचित असल्याचं चित्र समोर आलं आहे. जानेवारी महिन्यापासून योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याने महिलांनी गेल्या आठवड्यात थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा महिलांकडून केला जात असला, तरी तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण माहितेमुळे अनेक लाभार्थ्यांची लाडकी बहीण योजनेची केवायसी रखडल्याचं समोर येत आहे. भर उन्हात महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी गर्दी करत लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून थकीत लाभ देण्याची मागणी केली आहे. आता या वंचित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पैसेच येत नाही

दरम्यान, नांदेडमधील लाडक्या बहिणी सध्या नाराज आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने हतबल झालेल्या महिलांनी दोन दिवसांपूर्वी थेट महिला आणि बाल विकास कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केलं होतं. अनेक महिन्यांपासून केवायसी प्रक्रिया बंद असल्याचा आरोप लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी केला होता. केवायसी प्रक्रिया तात्काळ सुरू करून प्रलंबित पैसे जमा करावेत, काही महिलांना पैसे मिळत असतील आणि काही महिलांना मिळत नसतील तर हे चूक आहे. त्यामुळे सर्वांसाठी समान निर्णय घ्यावा, नाहीतर सर्वच महिलांचे पैसे बंद करावेत अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

Follow Us