शरद पवार हे जापानी गुडिया सारखे, प्रत्येकाला वाटतं मलाच… नितीन गडकरी यांची कोटी; नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 31, 2023 | 1:31 PM

जातपात महत्त्वाची नसते. कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. जातीला माझ्याजवळ स्थान नाही. मी एकदा म्हटलं होतं, जो करेगा जात की बात, वो खायेगा लाथ. पार्टीला कार्यकर्त्यांनी ताकद मिळवून दिली. त्यांची तीच ताकद पार्टीला यश मिळवून देते, असं नितीन गडकरी म्हणाले.

शरद पवार हे जापानी गुडिया सारखे, प्रत्येकाला वाटतं मलाच... नितीन गडकरी यांची कोटी; नेमकं काय म्हणाले?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 31 जुलै 2023 : पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला काही ना काही मिळेल अशी आशा असते. कोणतं तरी पद मिळेल, आमदारकी किंवा खासदारकी मिळेल असं वाटत असतं. त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक कोटी केली. गडकरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला. शरद पवार हे जापानी गुडियासारखे आहेत. प्रत्येकाला वाटतं मलाच बघतात, माझ्याकडे पाहूनच डोळा मारतात. मात्र, प्रत्यक्षात तिकीट दुसऱ्यांनाच मिळते, नितीन गडकरी यांनी असं भाष्य करताच एकच खसखस पिकली.

नागपूरमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा काल पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी हे विधान केलं. एकदा विधान मंडळात खूप भांडण झालं होतं. मी त्यावेळी शरद पवार यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. पान ठेल्यावर एक जापानी गुडिया असते. तुम्ही कोणत्याही दिशेने असला तरी ही जापानी गुडिया डोळा मारते. प्रत्येकजण म्हणायचे की, मला पाहूनच डोळा मारला. मी म्हटलं हे शरद पवार असेच आहेत बघा. प्रत्येकाला पाहतात. प्रत्येकाला वाटते साहेब आले. त्यांनी मलाच पाहिले. मलाच डोळा मारला. साहेबांनी सांगितलं काळजी करू नको. कामाला लाग. म्हणजे पुढच्यावेळी मीच. पण भलत्यांनाच तिकीट मिळायचं, असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

हे सुद्धा वाचा

मिळालं तर बोनस, नाही तर…

पक्षात सर्वांना संधी मिळते, पण प्रत्येकाला पद मिळू शकत नाही. पण जे नेते आहेत, त्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय राहत नाही. मिळालं तर बोनस नाही तर दु:ख नाही. पण मी काम करत राहील या मनस्थितीत राहा, हा माझा तुम्हाला सल्ला आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

ऑक्टोबरमध्ये निवडणुका

एक काळ होता सर्व जिल्हा परिषद आपल्याकडे होती. पंचायत समित्या आपल्या होत्या. नगरपरिषदा आपल्याकडे होत्या. आता 50 टक्क्याने आपल्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे कामाला लागा. तुमच्या प्रयत्नाने पार्टी जिंकली पाहिजे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत पक्षाला निवडून देणं आणि पक्षाची शक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

आघाड्या म्हटल्या की दावेदारीही मोठी

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. तिघांना जागा वाटपात अडचण येणार असल्याचंही गडकरी यांनी बोलून दाखवलं. बावनकुळे साहेबांसमोर आता मोठं आव्हान आहे. एक तर तीन-तीन पार्ट्या आहेत. त्यात कुणाला किती जागा मिळणार हा प्रश्न आहे. हे पक्ष मोठे आहेत. त्यांनी जागा अधिक मागितल्या तर अडचण वाढते. आघाड्या म्हटलं की दावेदारी सुद्धा मोठी असतात, असंही ते म्हणाले.

राजकारणातही पूर

पावसाळ्यात पूर येतो तसा राजकारणात सुद्धा पूर येत असतो. मात्र पक्षाची निष्ठा महत्त्वाची असते. तुम्ही निवडून आले आणि तुम्ही जनतेची काम केली नाही तर पुन्हा जनता तुम्हाला निवडून देणार नाही. काही लोक जो निवडून येतो त्याचे कटाऊट लावतात. निवडून आला नाही तर त्याला विसरतात. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे हा विचार ठेवला पाहिजे. पक्ष मजबूत नसेल तर आपण मजबूत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.