तुम्हाला माझी जात माहितीये का? नाना पाटेकरांचा नितीन गडकरींना सवाल; नेमकं काय घडलं?

जात आणि धर्माच्या राजकारणावरून अभिनेते नाना पाटेकर यांनी मार्मिक टिप्पणी केली. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर असलेल्या नितीन गडकरींना त्यांनी प्रश्न विचारला, "माझी जात कोणती हे तुम्हाला माहीत आहे का?"

तुम्हाला माझी जात माहितीये का? नाना पाटेकरांचा नितीन गडकरींना सवाल; नेमकं काय घडलं?
Nitin Gadkari and Nana Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2026 | 11:26 AM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या रोखठोक मतांसाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतंच नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी धर्म आणि जातीच्या राजकारणावरून डोळ्यांत अंजन घालणारं वक्तव्य केलं. या कार्यक्रमात मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. “गडकरी साहेब, तुम्हाला माहितीये का माझी जात काय आहे”, असा थेट सवाल यांनी या कार्यक्रमात केला. मी कधीच कोणाला माझी जात सांगितली नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही, असं ते स्पष्ट म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी इतर विषयांवरही भाष्य केलं. नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती’ परिषद आयोजित करण्यात आलं होतं. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर, नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमात नाना म्हणाले, “मी माझी जात कधीच कुणाला सांगितली नाही. माझ्या आईने मला लहानपणीच एक गोष्ट शिकवली होती, जी मी आजपर्यंत पाळत आलोय. तुझी जात फक्त माणूस आहे आणि तुझा धर्म माणुसकी आहे, असं आई म्हणाली होती. त्यापलीकडे जाऊन स्वत:ची ओळख सांगण्याची गरज नाही. मुसलमान आणि हिंदू यांच्यातील फरक काय आहे, असा प्रश्न मी नेहमी आईला विचारायचो. त्यावर ती मला सांगायची की, हिंदू हात जोडून प्रार्थना करतात, तर मुस्लीम हात उघडून. आपल्या समाजातील जातव्यवस्था कधी संपणार नाही. जातीतील फरक ज्ञानाने आणि शिक्षणानेच संपवू शकतो.” नानांच्या या भाषणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी नाना पाटेकरांनी समाज आणि राजकारणात वाढणाऱ्या जातीयवादावर चिंता व्यक्त केली. “माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून किंवा कर्तृत्वावरून नाही तर तो कोणत्या जातीत जन्मला यावरून ठरवली जाते, हे दुर्दैवी आहे. आपण माणूस म्हणून एकत्र यायला हवं. तेव्हाच आपण जातीधर्माच्या भिंती पाडू शकू”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले. या कार्यक्रमात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसादेखील केली. गडकरी हे राजकारणातील अजातशत्रू आहेत, असं ते म्हणाले.

Follow Us