मुंबई : राज्यातील काँग्रसेचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. हे आमदार राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेणार आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडकडे जाण्यात काहीही गैर नाही. कोणताही आमदार नाराज नाही. तशी कोणतीही माहिती माझ्याकडे आलेली नाही, असं पटोले म्हणले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
“आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हायकमांडला भेटणं हे चुकीचं नाहीये. मंत्र्यावर ते नाराज आहेत, असं माझ्यापर्यंत तर काही आलेलं नाही. राज्यात काँग्रेस एकजुटीने काम करत आहे. लोकांना काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाही, असं पटोले म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा मुद्द्यावरही भाष्य केलं. “आम्ही दोन पंतप्रधान सुरक्षेच्या अभावी गमावलेले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेविषयी जो प्रश्न निर्माण झाला त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. त्याकडे राजकारणाने पाहत नाही. मात्र केंद्राच्या गृहमंत्रालयाने पंतप्रधानांचा दिलेला दौरा ऐनवळी बदलण्याचं काम झालं. पंतप्रधानांची गाडी थांबवली गेली तेव्हा भाजपचे लोक त्यांच्याबाजूला उभे होते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. आधीच दोन पंतप्रधान गेलेले आहेत. यामध्ये काँग्रेसचीही हानी झालेली आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यबद्दलचं दु:ख कोणीही विसरू शकत नाही,” असे नाना पटोले म्हणाले.
तसेच जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकांनी आरएसएसची रेकी केल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती. त्यावर बोलताना, हा गुप्ततेचा विषय आहे. असा कुठलाही हमला महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांनी आमदारांच्या नाराजीची चर्चा फेटाळली असली तरी हे आमदार दिल्लीला आपली नाराजी कळवणार असल्याचं म्हटलं जात आहे. आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे तक्रार करण्याऐवजी थेट दिल्लीत हायकमांडला भेटण्याचं ठरवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पटोले यांच्याकडून नाराजी दूर होण्याची शक्यता नसल्याने हे आमदार दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
इतर बातम्या :
डिझाईनर मास्कवरुन अजितदादांच्या सूचना, काल किशोरीताई म्हणाल्या मला ‘मॅचिंग’ची आवड, आज N95 घातला
bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड