Nashik Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं; भीतीने लोकांची पळापळ, सततच्या हादऱ्याने नागरिक भयभीत
नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. भूकंपाच्या भीतीने लोकांची पळापळ झाली. तर सततच्या हादऱ्याने नागरिक भयभीत झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने होणार्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाच्या धक्क्याने काही नागरिकांची एकच पळपळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भागात बुधवारी सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के
सकाळच्या सुमारास अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये तीव्र घबराट पसरली. जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे जाणवल्याचे समोर आलं आहे. मागील महिनभरात 5 ते 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार होणार्या भूकंपामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण आहे.
हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे हादरे
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के हे काल सायंकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास जाणवले. या भूकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये भीती पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदु कांग्रा जिल्ह्यातील दारिणी धार येथे होता. हिमाचल प्रदेशात झालेल्या भूकंपाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हिमाचल प्रदेशातील कांगडा आणि चंबा हे दोन्ही भूकंपीय क्षेत्र- 5 मध्ये येतात. या भागाचा समावेश उच्च नुकसान जोखमीचे क्षेत्र म्हणून करण्यात आला आहे.
