Nashik IT Company Scandal : ‘माझा मुलगा तर…’ धर्मांतरण प्रकरणात आरोपीच्या आईचा मोठा दावा
नाशिकमधील नामांकित कंपनीतीव लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आरोपीच्या आईने, आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपल्या मुलाला यात नाहक गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेकांना अटक केली असून, एका कथित संघटित नेटवर्कचाही तपास करत आहेत.

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिलांचा लैंगिक छळ आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न या घटनेने राज्य हादरलं असून रोज त्याबद्दल काही ना काही नवी, महत्वाची माहिती समोर येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असली तरीही या केसमधील प्रमुख सूत्रधार, कंपनीची एचआर निदा खान ही फरार आहे. तिच्यावर अनेक आरोप असून मुलींना टार्गेट करणाऱ्या आरोपींना तिने साथ दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला दानिश खानवरही अनेक आरोप आहेत. मात्र त्याची आई त्याच्या बचावार्थ समोर आली आहे. माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी केला. माझा मुलगा चांगला माणूस आहे, त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. दानिशचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड्स नाहीत, तो अभ्यासात आणि कामात नेहमी चांगला होता, चांगलं काम काम करायचा असा दावाही त्यांनी केला.
धर्मांतरणाच्या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘ माझा मुलगा कोणाचंही धर्मांतरण करू शकत नाही. धर्मांतरण असं होत नसतं, आमच्या धर्मात ही प्रथा केवळ धर्मगुरूंच्या माध्यमातूनच पार पाडली जाते, असं त्या म्हणाल्या. नाशिकच्या कंपनीतील प्रकरणात महिलांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझा मुलगा असं काही करूच शकत नाही’ , असा ठाम दावा त्यांनी केला.
तसेच संबंधांच्या आरोपांबाबत बोलताना त्या म्हणाल्या,की ‘ मला अशा कोणत्याही संबंधाबद्दल माहिती नव्हती. माझ्या मुलाची इतर महिलांशी फक्त मैत्री होऊ शकते असंही त्यांनू नमूद केलं. एवढंच नव्हे तर दानिशने त्याच्या पत्नीला या मैत्रीबद्दल सांगितलं होतं, तसेच त्याने कधीच ( त्या महिलेला) घरी बोलावलं नाही’, असा दावा ठामपणे त्यांनी केला.
आरोपीच्या आईचा धक्कादायक दावा
माझा मुलगा आणि पीडित यांच्यातील कोणत्याही संबंधाबद्दल मला माहिती नव्हती. (त्यांच्यात) जर असा काही संवाद झाला असेल, तर तो पूर्णपणे मैत्रीपूर्ण होता, असं आरोपीच्या आईने स्पष्टपणे सांगितलं. ती महिला त्याची मैत्रीण आह, अं माझ्या मुलाने आधीच त्याच्या पत्नीला सांगितल्याचंही त्याच्या आईने नमूद केलं.
त्याच्या पत्नीने पीडितेला फोन करून दानिश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत हे सांगितले होते का, असा प्रश्न त्याच्या आईला विचारण्यात आला होता. ‘माझ्या मुलाने कदाचित आपल्या पत्नीला आधीच सांगितले असेल की ते फक्त मित्र आहेत, आणि त्याने तिला कधीही घरी आणले गेले नव्हते’ असं त्या यावेळी म्हणाल्या. माझा मुलगा, दानिश शेख एक हुशार आणि प्रामाणिक असून त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही असं म्हणत त्यावा एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अटक करण्यात आलेल्या इतर तरुणांविषयीही त्याची आई बोलली, ते सर्वजण चांगले आणि निर्दोष आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेला, तौसीफ अत्तार हाही एक चांगला मुलगा असल्याचं म्हणत, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा दानिशच्या आईने केला.
कुटुंब मोडकळीस
‘या प्रकरणामुळे माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. घरात आता कोणाचाही आधार उरलेला नाही आणि माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी जिवापाड प्रयत्न करत आहे’, असं त्या म्हणाव्या. ‘माझ्या मुलावर झालेल्या आरोपांमुळे माझी सून नैराश्यात गेली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या मुलांची प्रकृतीही खालावली असून ते दिवसभर रडत असतात’ असं त्यांनी भावूक होऊन सांगितलं. एवढंच नव्हे तर ‘आता या वयात मी एकटीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी संघर्ष करते आहे, मला कोणाचाही सहारा, कोणाचीही मदत मिळत नाहीये’, असं त्यांनी नमूद केलं.
सर्व आरोप निराधार, खोटे
नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरणाचा प्रयत्न, या केसमध्ये आत्तापर्यंत 9 FIR दाखल करण्यात आले आहेत. एका पुरुष कर्मचाऱ्यानेही, आपला धार्मिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून त्याेनही तक्रार दाखल केली होती. या केसमध्ये आत्तापर्यंत सात पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ आफताब अन्सारी आणि शाहरुख शेख यांचा समावेश आहे. आणखी एका महिला व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली आहे.
तर कंपनीची एचआर हेड निदा खान ही मात्र अजूनही फरार आहे. पोलिस तिचा कसून शोध घेत असून तिच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात. या नेटवर्कमध्ये तिचा प्रमुख सहभाग होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हे सात पुरुष आरोपी बहुतांश प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले असून, ते एकत्र मिळून काम करत होते असंही पोलिसांचे म्हणणं आहे.
या प्रकरणाच्या तपासात असंही उघड झालं की, पीडितांपैकी बहुतांश महिला 18 ते 25 वयोगटातील होत्या. त्यांना मानसिक दबाव, धार्मिक टीका आणि अयोग्य वागणुकीचा सामना करावा लागला, असाही आरोप आहे. आरोपींनी धार्मिक चिन्हं आणि श्रद्धांबद्दल अपमानजनक टीका केली, तसेच पीडितांना विशिष्ट पदार्थ खाण्यासाठी दबाव आणला गेला आणि धार्मिक कार्यात भाग घेण्यास भाग पाडले गेले असंही तक्रारींमध्ये म्हटलं आहे.
