Nashik Company Scandal : बिभत्सतेचा कळस… थेट इमामाशी लग्न करायची ऑफर, टीसीएस केसमधील धक्कादायक खुलाश्याने सर्वच हादरले
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी दानिश शेखने त्याचे लग्न लपवले आणि नंतर तिला एका इमामशी लग्न करण्याचा सल्ला दिला, असा आरोप एका पीडितने केलाय. तिचे नाव बदलणे, कागदपत्रे गोळा करणे आणि तिचे धर्मांतर करण्याच्या कथित योजनेचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.

नाशिकमधील आयटी कंपनीतील काही महिलांचे झालेले लैंगिक शोषण आणि कथित धर्म परिवर्तनाचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. या केसमध्ये एचआर निदा खानसह अनेकांना अटक झाली असून आता आरोपपत्र दाखल करण्यात आली आहे. त्यातून अनेक मोठे, धक्कादायक खुलासे झालेत. चार्जशीटमधील पीडित तरूणीच्या जबाबानुसार, आरोप दानिश शेख याने त्याचं लग्न झाल्याची आणि मुलं असल्याची माहिती पीडितेपासून लपवली होती. मात्र जेव्हा तिला याबद्दल समजलं आणि तिने त्याच्याकडे विचारणा केली, माझ्याशी आता लग्न कोण करणार असं तिने आरोपीला विचारलं असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून ती हादरलीच. दानिशने कथितपणे तिला सांगितलं की, जर कोणीच लग्न करण्यास तयार झालं नाही ती त्यांच्या जमातीच्या इमाम साहिबांशी लग्न करू शकते.
आरोपी तिचे नाव आणि धर्म बदलण्याचा कट रचत होते, असाही दावा पीडितेने केला. धर्मांतराची प्रक्रिया सार्वजनिक झाल्यास आपण पकडले जाऊ, अशी भीतीही आरोपींना वाटत होती, असंही तिने जबाबात म्हटल्याचं समोर आलं.
लग्नाचं सत्य समजताच वाद
पीडितेच्या जबाबानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये तिला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर कॉल आणि मेसेज आले. जेव्हा तिने तो नंबर दानिशला दाखवला, तेव्हा त्याने तो त्याचा घरचा नंबर असल्याचे सांगितले. नंतर दानिशने तो त्याच्या पत्नीचा नंबर असून त्याला दोन मुले असल्याचे कबूल केलं,असा आरोप पीडितेने केला. ते ऐकून पीडित तरूणी हैराण झाली. जेव्हा लोक तिला त्याच्या लग्नाबद्दल सांगायचे, तेव्हा तो तिला त्याकडे दुर्लक्ष करायला सांगायचा. सत्य समोर आल्यास ती त्याला सोडून जाईल या भीतीने मी घाबरलो, असं दानिशने तिला सांगितल्याचं पीडितेने म्हटलं.
इमाम साहेबांशी लग्न कर
आता माझ्याशी लग्न कोण करणार, असाव पीडितेने त्याला विचारला. तेव्हा दानिशने कथितपणे सांगितले की त्यांच्या समाजात बहुपत्नीत्व सामान्य आहे आणि तो तिच्यासाठी कोणीतरी शोधून देईल. अगदीच जर कोणी सापडलं नाही तर तू आमच्या समाजातील इमामशी लग्न करू शकतेस, असंही दानिशने सांगितल्याचा आरोप पीडितेने केला. इमाम साहेब म्हणजे कोण असंही तिने दानिशला विचारला. तेव्हा दानिशने तिला सांगितले की ते त्यांच्या जमातीचे इमाम आहेत आणि त्यांची पत्नी एका मदरशात शिकवते व ती तिला इस्लामचे नियम आणि अरबी भाषा शिकवू शकते.
नामबदल आणि कागदपत्रं जमवण्याचा प्लान
याशिवाय, पीडितेने असा आरोप केला की, आरोपी तौसीफ अत्तारने तिला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यासाठी मालेगावच्या एका टोळीचा उल्लेख केला होता. चार्जशीटनुसार , त्यानंतर दानिशने तिला तिची मूळ कागदपत्रे कंपनीत आणण्यास सांगितले. दानिशच्या सांगण्यावरून तिने तिची सर्व मूळ कागदपत्रे आणून त्याच्या बॅगेत ठेवली, असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. तिच्या नावावर नवीन कागदपत्रे तयार झाली की तू नोकरीसाठी बाहेर जात आहेस, अस पालकांना सांग, असा सल्लाही दानिशने पीडितेला दिल्याचे तिने नमूद केलं.
मुंबई आणि मलेशियाला पाठवण्याची कथित चर्चा
दानिश आणि तौसीफ यांनी पीडितेच्या धर्मांतराविषयी कोणालाही कळू नये म्हणून मुंबईत तिच्यासाठी नोकरी शोधण्याबाबतही चर्चा केली होती, असं पीडितेने दिलेल्या जबाबात सांगितलं. एवढंच नव्हे तर तौसीफने तिला मलेशियाला पाठवण्याचाही सल्ला दिल्याचा आरोप तिने केला. जोपर्यंत तिला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ती त्याच्या नातेवाईकाकडे राहू शकते आणि तिथे इस्लामी प्रथांचे पालन सुरू ठेवू शकते असंही तौसीफने तिला सुचवल्याचं पीजितेने सांगितलं.
दानिशने पीडितेचं, त्याच्या पहिल्या पत्नीशी, माहिरीनशी बोलणं करून दिलं होतं. नंतर, व्हॉट्सपवरील संभाषणात, माहिरिनने तिला भेटण्याची आणि इस्लामबद्दल काही गोष्टी समजावून सांगण्याची इच्छा व्यक्त केली असा आरोप पीडितेने केला. मात्र माहिरिनला आपलं बदललेले नाव कसे कळलं याबद्दल काळजी वाटत असल्याने पीडितेने ही भेट टाळली.
चार्जशीटमध्ये अनेक आरोपींची नावं
या कंपनीतील लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार आणि निदा खान यांचा समावेश आहे. एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचेही नाव आरोपपत्रात आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.त्यांनी निदा खानला आश्रय दिला होता असा तपास यंत्रणांचा आरोप आहे . महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात 100 हून अधिक साक्षीदारांचे जबाब समाविष्ट आहेत. कोणत्याही प्रकारच्या छळ आणि जबरदस्तीविरोधात त्यांचे शून्य-सहिष्णुता धोरण आहे आणि या प्रकरणात नाव असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं टीसीएसने म्हटलं होतं.
