राजकारणात मोठी उलथापालथ? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे थेट विलिनीकरणाचे संकेत; फक्त…

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चांना उधाण आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले असून, अजितदादा गटाने आघाडीतून बाहेर पडावे अशी अट रोहित पवारांनी आधीच ठेवली होती. मुश्रीफांच्या विधानांनी ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकारणात मोठी उलथापालथ? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे थेट विलिनीकरणाचे संकेत; फक्त...
Sharad Pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 2:06 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत दिले होते. अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या आघाडीतून बाहेर पडावे, अशी अटही रोहित पवार यांनी घातली होती. त्यामुळे राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू असतानाच आता अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विलिनीकरणाचे संकेत देऊन चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ हे नंदूरबारमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता त्यांना विलिनीकरणाबाबत विचारण्यात आलं. यावर मुश्रीफ यांनी थेट विलिनीकरणाचे संकेतच देऊन टाकले. अजितदादा असताना आम्ही महायुतीत जाण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता. त्यामुळे आम्ही तो निर्णय सोडण्याच्या विचारात नाही. पण विलीनीकरण व्हावे किंवा न व्हावे, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही युतीमध्ये होतो आणि युतीमध्ये राहणार आहोत, असं सांगतानाच अटी घालून ऑफर येत असतील तर कसं चालेल? विलीनीकरण व्हावे, यापूर्वी दादांनी प्रयत्न केले होते, असे संकेतच हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

अपघाताचा सीबीआय तपास व्हावा

मुश्रीफ यांनी अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला असल्यामुळे त्यातील संभाषण रेकॉर्ड झाले आहे. अजितदादांच्या पहिल्या पुण्यतिथीपूर्वीच तपास वेगाने झाला पाहिजे, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रवादीच मोठा भाऊ

यावेळी त्यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. गोकुळ दूध संघाची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आम्ही महायुती म्हणून लढणार आणि महायुती म्हणून जिंकणार आहोत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जरांगेंच्या मागण्या मान्य

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली असून जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन करतानाच जरांगे कुठल्या विरोधकांच्या भरोशावर आंदोलनाला बसलेले नसून, ते समाजासाठी बसले आहेत. मराठा समाजाला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us