मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, राज्य सरकारची पहिली सावध प्रतिक्रिया… मनोज जरांगेंच्या घोषणेनंतर विखे पाटील म्हणाले काय?
Radhakrushana Vikhe Patil on Manoj Jarange: आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा मोर्चा जाणार असल्याची मोठी घोषणा केली. 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीनंतर याविषयीचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावर आता सरकारमधून सावध प्रतिक्रिया आली आहे.

मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणारच असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर केले. आंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना त्यांनी 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीचा उल्लेख केला. त्यानंतर मुंबईत जाण्याची तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर सरकारमधून सावध प्रतिक्रिया आली आहे. मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
SEBC आरक्षणावर काय भाष्य?
SEBC चं जे आरक्षण दिलेलं आहे. त्यातील 10 टक्के आरक्षणाचा विशेषतः मराठा मुलांना मोठा फायदा होत आहे. एसईबीसीला कोणत्या न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी आपण विशेष लक्ष घातलं आहे. एसईबीसीचं आरक्षणाचा समाजातील मुलांना मोठा फायदा होईल. अशी वस्तुस्थिती नाही की, त्याचा लाभ कुणालाच मिळत नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा मोर्चाविषयी मोठी प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा मोर्चा धडक देण्याची घोषणा आज आंतरवाली सराटीतून केली आहे. 12 तारखेला याविषयीचे जाहीर घोषणा ते करणार आहेत. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे सहकारी याप्रकरणात लक्ष घालत आहेत. त्यांचा अंतिम अहवाल समोर आला, तेव्हा निर्णय घेऊ, असे विखे म्हणाले. जे नेते आतापर्यंत मराठा समाजाची बाजू घेऊन बोलत होते, ते आता पक्षाची बाजू घेऊन बोलत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर बोलताना, त्या वादात आता पडण्याचे कारण नाही. ज्या मागण्या समोर आल्या आहेत. त्याची परिपूर्ति करण्याचे काम सरकार करत आहे. आणखीही त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार निश्चितपणे त्याचा विचार करेल, असे विखे यांनी स्पष्ट केले.
कमी पावसामुळे राज्यात परिस्थिती गंभीर
लोकांनी पेरण्या केल्यात. पीकं चांगली होती. पण पाऊस नसल्याचा परिणाम दिसत आहे. सोयाबीनसह इतर पीकं ही जवळजवळ संपलेली आहेत. परिस्थिती गंभीर आहे. स्वतः मी माहिती मागवत आहे. मुख्यमंत्री या विषयात गंभीर आहे. सर्व भागाचा अंदाज घेतल्यावर मग पुढे आम्ही कारवाई करू. सध्याची परिस्थिती पाहता आपण पिण्याचे पाणी राखून ठेवले आहे. उर्वरीत पाणी हे सिंचनासाठी देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या भागातील धरणात पाणी हे ते शेतीला देण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतीच्या पंचनाम्यासंबंधी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व भागाचा अहवाल आल्यानंतर चर्चा होईल असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
