VIDEO: एसटीला फायद्यात आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय; ठाकरे सरकार निर्णय घेणार?
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचं घोंगडं भिजत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचं घोंगडं भिजत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. एसटीला फायद्यात आणायचं असेल तर खासगीकरण करून चालणार नाही. त्यासाठी एखादी कंपनी नेमा, असा उपाय राज ठाकरे यांनी सूचवला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार राज ठाकरेंचा हा उपाय अवलंबणार का? याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना एसटीच्या संपाबाबत सवाल करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. एसटीचे खासगीकरण करण्यापेक्षा एखादी चांगली कंपनी नेमा. एसटी चालवण्यासाठी एखादी चांगली कंपनी का आणली जात नाही? असा सवाल राज यांनी केला.
एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?
एसटीच्या संपावर तोडगा काढला जावा. अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. उद्या एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल? असा सवाल राज यांनी केला. तसेच तुमच्या हातात राज्य लोकांच्या हितासाठी दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे, असं सांगतानाच एसटीतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या गोष्टी सुधारणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी एसटी संपाबाबत आमचा विषय निघाला होता, असं सांगतानाच एसटीच्या संपाबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिणार आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.
देशात आफ्रिकन राहतात का?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्वावर भाष्य केलं. त्यावरही राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांचं विधान वाचलं. हा देश हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांचा नाही. मग काय या देशात आता आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
घातपात असला तरी ते बाहेर येणार का?
सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हा अपघात होता की घातपात होता यावर संशय घेतला जात आहे. मात्र, हा घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का? असा सवाल करतानात या देशात अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे मिळतच नाही, हेच मी वारंवार सांगतोय, असंही त्यांनी सांगितलं.
युतीची चर्चा तुमच्याकडूनच समजते
मनसे आणि भाजपची युती होणार का? यावरही त्यांनी थेट भाष्य केलं. या युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स काय हे समजत नाही. युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्याबाबत मला काहीच माहीत नाही. मनसेने नाशिकमध्ये काम केलं होतं. ते नाशिककरांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: फडणवीस शाळेत जात होते तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा खोचक टोला