Nilem Gorhe: कधी कधी ठरवून सभागृह तहकूब करतो…नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, विधानभवनातील गोंधळावर फोडलं ते गुपीत
Nilem Gorhe on House Adjourned: विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नाशिकमध्ये एक खळबळजनक दावा केला आहे. त्यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील पडद्याआडची समेट समोर आली आहे. काय केला त्यांनी तो दावा?

Nilem Gorhe Big Statement: कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो, असा खळबळजनक दावा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात केला. अनेकदा विधानसभा, विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी गदारोळ घालतात आणि मग सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागतं. गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे पडद्याआड विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये अगोदरच समेट असते का, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. नाशिक इथं विश्व मराठी संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केला.
ठरवून सभागृह तहकूब करतो
नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनात नीलम गोऱ्हे यांच्या परिसंवादात विधानभवनात होत असलेला गोंधळ हा कोणत्या व्याकरणाचा अलंकार आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी संवाद साधताना नीलम गोऱ्हे यांनी ते गुपित फोडले. विरोधक काही प्रश्नावर सभागृहात गोंधळ घालतात, अर्थातच ते जो गोंधळ घालतात, त्यांची अपेक्षा असते की त्यांना बोलायला मिळावं.उदाहरणार्थ एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयात पैसे सापडले. अशावेळी विरोधकांना चर्चा करायची असते. पण नियम असा आहे की त्यांनी अगोदर नोटीस द्यावी लागेल आणि मग मंत्र्यावर आरोप करता येतील. आठ दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद पडला. पण तो तारांकित प्रश्न होण्यासाठी त्याची मुदत गेलेली असते. विरोधी पक्ष हा त्याचा धर्म आणि जबाबदारी पाळत असतो. तर सत्ताधारी पक्ष हा बुद्धिबळाच्या पटावर जशी दोन प्रकारची व्युहरचना केलेली असते. त्याचे पालन करतो.
त्यातील एक सीक्रेट असं की, सकाळीच आम्हाला हे किती वेळ गोंधळ घालणार आहेत हे माहिती असतं. आम्ही हे विचारतो सुद्धा की कितवेळ सभात्याग करणार आहात. काही वेळा पीठासीन अधिकाऱ्याने 15 मिनिटं थांबायचं आणि सुरळीत कामकाज करायचं असं सुद्धा ठरलेलं असतं. एखाद्यावेळी विरोधी पक्ष नेत्याकडून अपशब्द वापरल्या जातो. आता तो मुद्दामहून वापरतो की सहज वापरतो हे सर्वांना कळतं. पण अशावेळी सत्ताधारी पक्षाला कठोर भूमिका घ्यावी लागते. सभापतीला कठोर भूमिका घेत त्याला निलंबित करावं लागतं. हे निलंबन सात दिवसांचं असतं. मग ते खासगी येऊन दिलगिरी व्यक्त करतात. मग हे निलंबन तीन दिवस करण्यात येतं, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. पण
लोकसभेत दुर्देवाने काहीवेळा चर्चाच केली जात नाही. विधीमंडळ हे चर्चेसाठी आहे आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी देणं आवश्यक असतं. विधीमंडळातील कामकाज आणि आमदारांवर आमची बारीक नजर असते. त्यांना असं वाटतं की ते आपआपसात जे काही बोलतात ते आम्हाला ऐकू येत नाही. पण ते आम्हाला ऐकू येतं. ते कधी कधी म्हणतात की आम्हाला बोलण्याची संधी मिळेल असे वाटत नाही. पण आम्ही दुपारून त्यांना बोलण्याची संधी देतो. एकदा तर सभापती बाहेर पडल्यावर एका आमदाराने अंगविक्षेप केले होते. ते समजताच त्याचे निलंबन झाल्याची आठवण नीलम गोऱ्हे यांनी सांगितली.
