भाजपचा शिवसेनेला धक्का; नगरसेवकांना गळाला लावून उपनगराध्यक्षांना पकडले कोंडीत

| Updated on: Dec 31, 2020 | 8:09 AM

यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही भाजपकडून आशाताई चव्हाण यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला होता. | chalisgaon nagar parishad

भाजपचा शिवसेनेला धक्का; नगरसेवकांना गळाला लावून उपनगराध्यक्षांना पकडले कोंडीत
Follow us on

जळगाव: चाळीसगाव नगरपरिषदेत (Chalisgaon nagar parishad) शिवसेनेचा सहभाग असलेल्या शहर विकास आघाडीतील नगरसेवकांना गळाला लावत भाजपने उपनगराध्यक्षा आशाताई चव्हाण (Asha Chavan) यांना कोंडीत पकडले आहे. भाजपशी (BJP) हातमिळवणी केल्यानंतर या तिन्ही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षा आशाताई चव्हाण यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. (No confidence motion against Shivsena Asha Chavan in chalisgaon nagar parishad)

राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडीच्या 3 नगरसेवकांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. यामध्ये आण्णा कोळी, यास्मिन बेग ,संगीता गवळी यांचा समावेश आहे. नगरपालिकेत एकूण 33 सदस्य आहेत त्यातील 17 नगरसेवक सेनेच्या उपनगराध्यक्षा आशाताई चव्हाण विरोधात गेले आहेत. चव्हाण यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी नगराध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता चाळीसगाव नगरपरिषदेत शिवसेनेला नामुष्कीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही भाजपकडून आशाताई चव्हाण यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला होता. तेव्हादेखील भाजपने आशा चव्हाण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मनपाच्या कारभारात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप असतो. ठराविक नगरसेवकांच्या वॉर्डातच कामे होतात, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

चाळीसगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हजारावर अर्ज

चाळीसगाव तालुक्यात एकूण 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने कडाक्याच्या थंडीत देखील वातावरण तापलं आहे.76 ग्रामपंचायतींमधील, 734 जागांसाठी 264 प्रभागात मतदान होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याच शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. निवडणुकीसाठी हजारावर अर्ज आले आहेत.

अनेक मोठी आणि नावजलेल्या गावांच्या निवडणुका होतील त्यात मेहुणबारा, टाकळी प्र.चा.टाकळी प्र.दे.,रांजणगाव, पिंपरखेड, खडकी ,तांबोळा,अशा मोठ्या गावांचा समावेश आहे.

चाळीसगाव पालिकेच्या ‘शताब्दी’चा पडला विसर

आशा चव्हाण अकार्यक्षम असल्याचे आरोप होणे ही नवी गोष्ट नाही. यापूर्वी 2018 साली चाळीसगाव नगरपरिषदेच्या शताब्दी वर्षाचा विसर पडल्यामुळे आशा चव्हाण चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी आशा चव्हाण या चाळीसगावच्या नगराध्यक्षा होत्या.

चाळीसगाव नगरपरिषदेची स्थापना ब्रिटीशांच्या काळात झाली होती. त्यामुळे या नगरपालिकेला वेगळे महत्त्व आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या शहराचा आत्मा असतात. चालता-बोलता इतिहास म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरीही उत्तर महाराष्ट्रात लौकिक असणाऱ्या चाळीसगाव नगरपालिकेच्या शताब्दीचा विसर पडल्याने आशा चव्हाण यांच्यावर बरीच टीका झाली होती.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक ‘मातोश्री’वर

(No confidence motion against Shivsena Asha Chavan in chalisgaon nagar parishad)