Khalapur Landslide : त्या मुलांमुळे गाव जमीनदोस्त झाल्याचं कळलं… 15 तास उलटले; अजूनही 150 लोक बेपत्ता

| Updated on: Jul 20, 2023 | 3:06 PM

इर्शाळवाडीत एक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी झोपायला जातात. कालही सहा विद्यार्थी शाळेत झोपायला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रचंड मोठा आवाज आला. काही तरी घडल्याचं त्यांना जाणवलं.

Khalapur Landslide : त्या मुलांमुळे गाव जमीनदोस्त झाल्याचं कळलं... 15 तास उलटले; अजूनही 150 लोक बेपत्ता
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023 : खालापूर येथील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. गावातील घरांवर दरड कोसळल्याने 17 घरे जमीनदोस्त झाली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 34 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही या दुर्घटनेतील 150 लोक बेपत्ता आहेत. 15 तास उलटले तरी या गावातील 150 लोकांचा शोध लागेला नाही. या भागात प्रचंड पाऊस पडत आहे. तसेच जेसीबीही डोंगर माथ्यावर नेता येत नसल्याने बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत.

काल रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. इर्शाळवाडी या गावातील लोक झोपी गेले होते. गावातील लोक झोपेत असतानाच डोंगराचा कडा तुटला आणि थेट घरंगळत वस्तीवर येऊन आदळला. या डोंगर कड्याबरोबर मातीचा प्रचंड ढिगारा आणि झाडेही घरंगळत आली. त्यामुळे घरासह घरातील माणसं वाहून गेली. तर काही जण जमिनीखाली दबून गेली. महिला, पुरुष, लहान मुलं आणि म्हातारे कोतारेही या ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यामुळे हाहा:कार उडाला.

हे सुद्धा वाचा

त्यांना समजलं म्हणून

इर्शाळवाडीत एक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी झोपायला जातात. कालही सहा विद्यार्थी शाळेत झोपायला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रचंड मोठा आवाज आला. काही तरी घडल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे या मुलांनी बाहेर येऊन पाहिलं तर गावावर दरड कोसळल्याचं कळलं. त्यामुळे या पोरांनी तात्काळ इतर गावात जाऊन लोकांना बोलावून आणलं. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीमला माहिती देण्यात आली. त्यामुळे ही मोठी आणि भयंकर दुर्घटना माहीत पडली. या मुलांनी शाळेचा आसरा घेतला नसता तर ही घटना कळलीच नसती असं म्हटलं जात आहे.

गिरीश महाजन रात्रीच पोहोचले

या घटनेची माहिती मिळताच उद्योगमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी घटनास्थळी रात्रीच पोहोचले. पण रात्रीचा अंधार असल्याने उदय सामंत आणि दादा भुसे वर जाऊ शकले नाही. मात्र, गिरीश महाजन आणि महेश बालदी मोबाईल टॉर्चच्या उजेडात रात्री 3 वाजता डोंगरमाथ्यावर पोहोचले. तिथे पोलीस अधिकारी आधीच पोहोचले होते.

आम्हालाही भीती वाटत होती…

आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तिथे पाऊस आणि वारा जोरदार होता. रात्रीचा अंधार होता. त्यामुळे काहीच काम करता येत नव्हतं. रात्र किर्रर असल्याने अजून दरड कोसळणार तर नाही ना अशी भीती आमच्या मनात होती. त्यामुळे पहाटेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. पहाटे 5 वाजता एनडीआरएफची टीम आली. एकूण 100 जवान होते. नंतर स्थानिक रेस्क्यू टीम आल्या. असे एकूण 200 लोक जमले आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली, असं महाजन यांनी सांगितलं.

150 लोक बेपत्ता

ही 250 लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी 60 ते 70 घरे आहेत. यातील 17 घरे जमीनदोस्त झाली आहेत. असं असलं तरी 30 ते 35 घरातील लोक अजूनही बेपत्ता आहेत. आम्ही आतापर्यंत 90 लोकांचा शोध घेऊ शकलो आहे. तर दहा मृतदेहही मिळून आले आहेत. मात्र, अजूनही 150 लोक बेपत्ता आहेत. रात्री 10ची वेळ होती. सर्व झोपलेले होते. ग्रामीण आणि डोंगराळ भाग असल्याने लोक रात्रीचे फिरत नाहीत. सर्व घरातच होते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची पायपीट

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच खालापूरकडे निघाले. सकाळी साडेसात 8 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री खालापुरात आले. पण निसरडा रस्ता असल्याने मुख्यमंत्री इर्शाळवाडीत जाऊ शकले नाही. त्यांनी डोंगराच्या पायथ्याशीच उभं राहून माहिती घेतली. आढावा घेतला.

 

नागरिकांची विचारपूस केली. मात्र, त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी डोंगरमाथ्यावर जायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीड तास पायपीट करत डोंगरमाथ्यावर पोहोचले. या दरम्यान, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संपर्कात होते. त्यांना आवश्यक त्या सूचनाही देत होते.

दोन दिवसात प्रचंड पाऊस

दरम्यान, खालापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसात या भागात 499 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यावरून या भागात किती प्रचंड पाऊस झाला याचा अंदाज येतो.

हेल्पलाईन नंबर

810819555