रात्रीच्या अंधारात डोंगर कड्याने अख्खा गाव गिळला; दृश्य पाहून जवानाचा हृदयविकाराने जागीच मृत्यू

| Updated on: Jul 20, 2023 | 1:20 PM

रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

रात्रीच्या अंधारात डोंगर कड्याने अख्खा गाव गिळला; दृश्य पाहून जवानाचा हृदयविकाराने जागीच मृत्यू
shivram dhumne
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023 : खालापूर येथील इर्शाल गडावरील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने भयंकर दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपलेले असतानाच डोंगर कडा तुटल्याने संपूर्ण गाव या डोंगर कड्याखाली दबला गेला. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 25 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.

काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केली.

हे सुद्धा वाचा

जवानाचा मृत्यू

इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. चिखल तुडवत आणि डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले. शिवराम ढुमणे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते नवी मुंबई महापनगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी होते.

अंधारामुळे मदत कार्यास अडचणी

दरम्यान, रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत.

आक्रोश आणि मातम

दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडीतील लोकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बदलापूरहूनही एक कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आलं आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी तर घटनास्थळी येताच समोरचं दृश्य पाहून टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची मुलगी, कुणाचा जावई, कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडील दगावले आहेत.

लहान मुले दगावल्याची भीती

या गावात अनेक लहान मुले होती. ही मुले रात्री झोपी गेली होती. डोंगर कडा कोसळल्याने मोठ्या माणसांना पळ काढता आला. पण लहान मुलांना पळता आलं नाही. त्यामुळे या दुर्घटनेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर दगावल्याचं सांगितलं जात आहे.

हेल्पलाईन नंबर

8108195554