मोठी बातमी! अजितदादांना मोठा धक्का, शिंदेंनी डाव साधला, मित्र पक्षानंच केला गेम

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, महापालिका निवडणुकीपूर्वी बड्या नेत्यानं अजित पवार यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! अजितदादांना मोठा धक्का, शिंदेंनी डाव साधला, मित्र पक्षानंच केला गेम
Updated on: Sep 08, 2025 | 8:44 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीचा मोठा पराभव झाला होता, मात्र त्यानंतर विधानसभेत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आणि राज्यात महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं तर महायुतीचे तब्बल 232 उमेदवार निवडून आले.  दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांचे नेतेच महायुतीमधील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.

दरम्यान राज्यात आता पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, या पार्श्वभूमीवर सर्वाज राजकीय पक्षांनी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांच्या प्रमुखांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. गंगापूर विधानसभेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे, त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. कैलास पाटील यांच्यासोबतच माजी नगरसेवक महेश दहीहांडे यांचा देखील पक्षप्रवेश झाला आहे.  हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कैलास पाटील यांची प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना कैलास पाटील यांनी म्हटलं की,  आजचा दिवस माझा सोन्याचा दिवसं आहे. 1987 साली मला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी तालुका प्रमुख म्हणून संधी दिली. त्यानंतर  1997 साली मी उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केले. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यातला शिवसैनिक जिवंत ठेवला याचा अभिमान वाटतो.  1987 ला काम सुरु केले आणि 1997 ला शिवसेनेचा पहिला आमदार झालो. शिवसेना सोडून मी चूक केली, याचा मला पश्चाताप झाला. मी आता कोणत्याही अटीशिवाय पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष होतो, मात्र आता मी शिवसेनेत आलो आहे, असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.