विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून दखल, धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आली होती.
![विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून दखल, धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून दखल, धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/vijay-vadettiwar.jpg?w=1280)
नागपूर | 14 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासदंर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विधासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी मिळाली होती. त्यांना फोनवरून आणि मेसेजेद्वारे धमकी देण्यात आली होती. वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धमकी मिळाल्याची गंभीर बाब वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन धमकी देणाऱ्यांबाबत माहिती घेतली . तसेच – वडेट्टीवार यांना फोनवर धमकी देणाऱ्यांच्या फोन नंबरची पोलीसांनी नोंद घेतली असून धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
काय म्हणाले होते वडेट्टीवार ?
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. पण या मागणीला ओबीसी नेते म्हणून वडेट्टीवार यांनी विरोध दर्शवला होता. तसेच जरांगे पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीमधून नको अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली होती. मात्र या भूमिकेमुळे आणि जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलल्यानंतर वडेट्टीवर यांना धमकी मिळाली. धमकी आल्याची बाब वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवली होती.
यानंतरवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काल रात्री वडेट्टीवार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच धमकी देणाऱ्यांचे नंबर घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. सध्या विजय वडेट्टीवार यांवा वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात येते. तीन जवान आणि एक गाडी तैनात असते. मात्र लवकरच त्यांची सुरक्षा वाढवण्यात येईल, त्याबाबत गृह विभागाने हालचाल सुरू केली आहे.