मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, भिंतीखाली दबल्याने 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

| Updated on: Jun 11, 2021 | 3:59 PM

तर घरात असणाऱ्या इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Buldhana three years child died due to heavy rains)

मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, भिंतीखाली दबल्याने 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Buldhana three years child died due to heavy rains 1
Follow us on

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे घर पडल्याने भिंती खाली दबून एका 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर तीन गण गंभीर जखमी झाले आहे. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात ही घटना घडली. (Buldhana three years child died due to house collapsed in heavy rains)

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लाखोंचं नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तर काही घरांचे छप्पर उडून गेले आहेत. मेहकर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अंजनी बुद्रुक या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

अंजनी बुद्रुक या ठिकाणी राहणारे मनवर खा मस्तान खा पठाण यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी त्यांची 3 वर्षाची चिमुकली आशिया पठाण त्याखाली दबली गेली. अथक प्रयत्न करुन तिला बाहेर काढून उपचारासाठी औरंगाबाद नेण्यात आलं. मात्र वाटेतील बीबी गावाजवळ तिचा मृत्यू झाला. तर घरात असणाऱ्या इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सततच्या पावसामुळे घराचे आणि घरातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेचा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. मात्र यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

कोकणासह पुण्यात पावसाची विश्रांती  

एकीकडे मुंबई, नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पुण्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. तर रायगड जिल्ह्यातही सध्या कुठेच फारसा पाऊस नाही. सावित्री, कुडंलिका, आबां, पातळगंगा, गाढी, उल्हास सर्व प्रमुख नद्या इशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत. (Buldhana three years child died due to house collapsed in heavy rains)

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीचा इशारा, कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण आणि तलवापरिसरात जाण्यास बंदी!

Weather Report | महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार, पुण्यात पावसाची विश्रांती

Breaking : मालाड पाठोपाठ दहिसरमध्येही मोठी दुर्घटना, 3 घरं कोसळली, एकाचा मृत्यू