Rohit Pawar: MPSC चे अध्यक्ष तुमचे मित्र असतील तर, फडणवीस तुम्ही त्यांचं…रोहित पवारांच्या मागणीची चर्चा
Rohit Pawar Appeal to Devendra Fadnavis: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मोठी मागणी केली आहे. त्याची आता चर्चा होत आहे.

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील विविध शहरात एमपीएससीच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थी, उमेदवारांचे आक्रमक आंदोलन सुरू आहे. काल छत्रपती संभाजीनगर येथे या विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व रोहित पवार यांनी केले. त्यांनी नागपूरमध्ये पण आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. तर सीबीडी बेलापूरमधील एमपीएससीच्या कार्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मोठी मागणी केली आहे, अथवा त्यांना चिमटा काढला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रोहित पवार यांची जोरदार टीका
एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचा दावा करत, त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे रोहित पवार म्हणाले.“अशा प्रकारचा भ्रष्ट अधिकारी एमपीएससीचा अध्यक्ष असेल तर लाखो प्रथमेशसारख्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहील. पेपर फुटणार नाही, याची शाश्वती कोण देणार?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
तर त्यांचे पुनर्वसन करा
मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना, “तुमचे मित्र आहेत तर त्यांचे पुनर्वसन आमदार, खासदार म्हणून कुठेतरी करा; परंतु त्यांना एमपीएससीच्या ठिकाणी ठेवू नका,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा होऊन त्या ठिकाणी सक्षम व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत एमपीएससीविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
व्यवस्थेला धरले जबाबदार
दरम्यान, एमपीएससीचा अभ्यास करत असताना पुण्यात आत्महत्या केलेल्या परंडा तालुक्यातील खासापूर येथील प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची रोहित पवार यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रथमेशच्या आत्महत्येला ही संपूर्ण व्यवस्था जबाबदार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबतही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांची भाषा ही ग्रामीण भागातील भाषा आहे. राजकारणात अनेक नेत्यांनी महिलांबाबत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा फारसा अर्थ न घेता राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढावा, असे रोहित पवार म्हणाले.