किरीट सोमय्यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे फडणवीस, चंद्रकांतदादांनी उघड तरी सांगावं; सतेज पाटलांचं आव्हान

| Updated on: Sep 28, 2021 | 1:57 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील मंत्र्यांना टार्गेट केलं आहे. त्यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. (satej patil)

किरीट सोमय्यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे फडणवीस, चंद्रकांतदादांनी उघड तरी सांगावं; सतेज पाटलांचं आव्हान
सतेज पाटील, काँग्रेस नेते
Follow us on

सिंधुदुर्ग: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील मंत्र्यांना टार्गेट केलं आहे. त्यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्या यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे तरी सांगावं, असं आव्हानच सतेज पाटील यांनी दिलं आहे. (satej patil attacks kirit somaiya over targeted maha vikas aghadi leader)

सतेज पाटील आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही शहरात फिरण्याची काय आवश्यकता आहे? याचा अर्थ तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करत आहात. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढंच काम सुरू आहे. सत्य थोड्या उशीराने बाहेर पडतं. परंतु तोपर्यंत कारण नसताना लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठीचच हे षडयंत्रं असल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळ आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय. एकदा त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रालाही कळेल की राज्यात सुडबुद्धीचं राजकारण होतंय, असं ते म्हणाले.

चिथावणीखोर विधाने करू नका

यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरही भाष्य केलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मागच्या वेळी 144 कलम लावलं होतं. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. तुम्ही तिथे शांततेत जावं. भडकवणारी किंवा चिथावणीखोर विधाने करू नये. जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नये अशी आमची आता सुद्धा अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चिपीच्या निमित्ताने सर्व एकत्र येत आहेत

पाटील यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरही भाष्य केलं. विकास कामाच्या दृष्टिने एक चांगला कार्यक्रम सिंधुदुर्गात होत आहे. जिल्ह्यात विमानतळ व्हावं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे. जिल्ह्याच्या विकासासाठी सगळेच जण एकत्र येत आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. शेवटी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल समन्वयाने गेलं तर सिंधुदुर्ग जिल्हा पुढे येऊ शकतो. एक चांगला कार्यक्रम होईल याची आम्हाला खात्री आहे, असं त्यांनी सांगितलं.

यवतमाळ दुर्घटनेची चौकशी करणार

यवतमाळ दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. यवतमाळमधील उमरखेड येथील घटना दुर्दैवी आहे. वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बस पाण्यामध्ये वाहून गेली. काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अजून काही प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्याची सरकार जबाबदारी घेईल. वाहनचालकांना सक्त सूचना देण्यात येतील. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून पाण्यात बस घालू नये, अशा सूचना देण्यात येतील. यामध्ये चूक कुणाची आहे याची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. (satej patil attacks kirit somaiya over targeted maha vikas aghadi leader)

 

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya vs Hasan Mushrif : आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, अंबाबाईच्या दरबारात सोमय्यांचा एल्गार

आधी राणे म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजेत असं काही नाही, आता चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्तेच, राणे-ठाकरे एकाच मंचावर

Video: उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत, अन्यथा मेले असते, शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली

(satej patil attacks kirit somaiya over targeted maha vikas aghadi leader)