एका क्षणात होत्याचं नव्हतं… 12 मिनिटांत 15 भीषण अपघात, गाडी स्पॉटवर जाताच…. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काय घडलं?
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी अनेक भीषण अपघात घडले. महामार्गावर शुक्रवारी नऊ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहनांचा खड्ड्यात आदळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खड्ड्यात आदळल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत. तर अनेकांच्या वाहनांचं भरपूर नुकसान झालं. परंतु या अपघाताच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून […]

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी अनेक भीषण अपघात घडले. महामार्गावर शुक्रवारी नऊ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहनांचा खड्ड्यात आदळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खड्ड्यात आदळल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत. तर अनेकांच्या वाहनांचं भरपूर नुकसान झालं. परंतु या अपघाताच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागातील खड्ड्यात पाणी साचलं आहे. या पावसादरम्यान गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावर महालक्ष्मी येथील उड्डाणपुलावर दीड ते दोन फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्यातून व्हाईट टॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाहीये. या खड्ड्यामुळे खासगी वाहन तर काही अवजड वाहन अशा 15 वाहनांचं अपघात घडून मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या वाढत्या अपघातामुळे वाहन चालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
रस्त्यासाठी 620 कोटींचा खर्च
मागील वर्षी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॅपिंगसाठी तब्बल 620 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे हा महामार्ग खड्डेमुक्त होईल, अशी आशा स्थानिकांसह वाहनचालक आणि प्रवाशांना होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून देखील आजही या महामार्गाची दुरावस्था पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फक्त टोलचालकांचे खिसे भरायचे का, असा सवाल संतप्त वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय . आज पहाटे या खड्ड्यात माती टाकून हा खड्डा भरण्यात आला असला तरी पावसामुळे कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
एका अपघातग्रस्त चालकाने म्हटलं की, माझी कार अंदाजे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने धावत होती. रस्त्यावरून अचानक वाहन खड्ड्याला आदळली. त्यानंतर रस्त्यावर उभ्या वाहनांना धडकली. मी कार दोन महिन्यांपूर्वी खरेदी केली होती. माझ्या कारचे दोन्ही टायर फाटले आहेत. प्रशासनाने माझी नुकसान भरपाई द्यावी’. महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे रस्त्याचं बांधकाम आणि देखरेखीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी केली नाही, तर भविष्यात आणखी अपघाताच्या घटना घडतील. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.