अयोध्येमधील राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी, संघाची पहिली प्रतिक्रिया समोर, काय केली मागणी?
अयोध्येमधील राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अयोध्येमधील राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान त्यानंतर आता यावर पहिल्यांदाच आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक सांघाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होसबळे ?
‘अयोध्येतील भव्य श्रीरामलल्ला मंदिर हे पिढ्यान्पिढ्यांच्या संघर्षातून आणि कोट्यवधी रामभक्तांच्या समर्पण, त्याग व बलिदानामुळे संपूर्ण हिंदू समाजासाठी श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे पवित्र केंद्र बनले आहे. अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमधील रकमेची चोरी झाल्याची दुर्दैवी घटना संपूर्ण हिंदू समाजाच्या आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा व भावनांना मोठा धक्का देणारी आहे. या घटनेमुळे आपण सर्वजण अत्यंत व्यथित आहोत.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून, त्याच्या शिफारशीवर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संपूर्ण हिंदू समाजाची श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाकडून स्वाभाविक अपेक्षा आहे की, या अत्यंत निंदनीय घटनेला अपवादात्मक मानून मंदिराच्या व्यवस्थापन आणि संचालनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिराविषयी कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि विश्वास कायम अबाधित राहील. सध्या निर्माण झालेला संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण तातडीने दूर होणे गरजेचे आहे.
मंदिर प्रशासन आणि शासनाने स्थापन केलेले विशेष तपास पथक या प्रकरणात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच सक्षम आर्थिक व्यवस्थापन, सुयोग्य संचालन, पारदर्शक व निर्दोष व्यवस्था आणि पावित्र्यपूर्ण धार्मिक वातावरणाच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ करेल, अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले द्वारा जारी किया गया वक्तव्य : (नई दिल्ली, 3 जुलाई 2026)
श्री राम जन्मभूमि पर निर्मित भव्य मंदिर पीढ़ियों के संघर्ष और करोड़ों रामभक्तों के समर्पण, त्याग एवं बलिदान के कारण संपूर्ण हिन्दू समाज के लिए श्रद्धा, आस्था और… pic.twitter.com/5T72nmx87T
— RSS (@RSSorg) July 3, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाजालाही आवाहन करतो की, या कठीण काळात धैर्य आणि संयम राखावा. तसेच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याचा हिंदूविरोधी व राष्ट्रविरोधी शक्तींचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये.’ असं होसबळे यांनी म्हटलं आहे.
